
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू
दहावी, बारावीच्या सात लाख
उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू
शिक्षण मंडळाला दिलासा; कोल्हापूर विभागात १० हजार परीक्षक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू केलेले उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिलासा मिळाला. या शिक्षकांनी कोल्हापूर विभागात सोमवारपासून दहावी, बारावीच्या ७ लाख उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू केले आहे.
या शिक्षकांनी २३ फेब्रुवारीपासून बहिष्कार आंदोलन सुरू केले. त्यामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांच्या सुमारे ४ लाख ५० हजार, तर दहावीच्या मराठी, इंग्रजी विषयाच्या २ लाख ५० हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर महासंघाने २ मार्च रोजी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर शिक्षण मंडळात मुख्य आणि विषयनिहाय नियामकांच्या बैठका घेण्यात आल्या. उत्तरपत्रिकांची तपासणी सोमवारपासून सुरू झाली.
दरम्यान, याबाबत शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले की, ‘बारावीच्या पाच विषयांच्या, तर दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली आहे. इंग्रजीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी उद्या, गुरूवारपासून सुरू होईल.’
...
उत्तरपत्रिका शाळेतून बाहेर गेल्यास कारवाई
उत्तरपत्रिका तपासणीसाठी सुमारे १० हजार परीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून रोज २५ उत्तरपत्रिका तपासून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. त्यानुसार मुख्याध्यापकांकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. परीक्षकांनी शाळेतच उत्तरपत्रिकांची तपासणी करावयाची आहे. शाळेतून बाहेर उत्तरपत्रिका गेल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे डी. एस. पोवार यांनी सांगितले.