महात्मा जोतिबा फुले जयंती

महात्मा जोतिबा फुले जयंती

लोगो- ज्योतिबा फुले जयंती
...

महात्मा फुले यांचे विचार वर्तमानातही आवश्यक
मान्यवरांचे मत; शेतकरी आणि बहुजन समाजासाठी केले दिशादर्शक काम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः ब्रिटिशांच्या राजवटीत समाजातील विविध प्रथांविरोधात जोरदार आवाज उठवला तो महात्मा जोतिबा फुले यांनी. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, बालविवाह आदी विषयांवर त्यांनी समाजाला जागे करण्याचे काम केले. एकूणच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. फुले यांच्या कामाची ही यादी संपता संपणार नाही. त्यांच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या जयंतीनिमित्त या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधल्यानंतर सर्वच क्षेत्रात आजही महात्मा फुले यांचे विचार प्रस्तुत असल्याच्या भावना व्यक्त झाल्या.


महात्मा फुलेंचे विचार आजही प्रस्तुत
महात्मा फुले यांच्यानंतर पंचवीसहून अधिक वर्षे सत्यशोधक चळवळीचे काम थांबले. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने करवीर संस्थानांबरोबरच संस्थानाबाहेरही या कामाला पाठबळ मिळाले. सत्यशोधक विचार रुजवणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या वेदना त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ मधून मांडल्या. त्या आजही कायम आहेत. महिलांबाबतचे प्रश्न असोत किंवा शिक्षणातील विविध प्रश्नांबाबतही फुले यांनी परखडपणे विचार मांडले. केवळ महिला, शिक्षण, शेतीच नव्हे तर सर्वच क्षेत्रासाठी त्यांचे विचार आजही प्रस्तुत आहेत.
-डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

माणसाचा धर्म एकच असावा...
‘ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राम्हणाशी, धरावे पोटाशी बंधूपरी’ असा एकमय राष्ट्रनिर्मितीचा कैवार महात्मा फुले यांनी घेतला आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. पण, सद्यस्थिती काय आहे. विविध जाती-धर्मांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे. मुळात आपण कुठल्या जाती-धर्मात जन्माला आलो तरी घराचा उंबरा ओलांडला की आपण फक्त आणि फक्त भारतीयच असायला हवे. निर्मिकाने निर्माण केलेली पृथ्वी एकच आहे. ती साऱ्यांचा भार वाहते. एक पृथ्वी सर्वांना सुखी ठेवू शकते. मग, धर्म तरी वेगवेगळे कशासाठी? हा त्यांचा विचार आजही दिशादर्शक आहे.
- प्रा. डॉ. शरद गायकवाड

फुलेंचा पोवाडा म्हणजे शिवचरित्रच
शिवचरित्राच्या अभ्यासाने प्रभावित झालेले महात्मा फुले १८६९ साली रायगडावर पोचेले आणि तेथील छत्रपती शिवरायांची समाधी त्यांनी शोधून काढली. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी छत्रपती शिवरायांवर एक प्रदीर्घ पोवाडा लिहिला. अशिक्षित माणसालाही शिवाजी महाराजांचे चरित्र सहज समजेल, इतक्या सोप्या भाषेत त्यांनी तो लिहिला असून, तो अजूनही लिखित स्वरूपातच आहे. तत्कालीन विविध भाषांतील पुराव्यांचा अभ्यास करून त्यांनी मांडलेले हे शिवचरित्रच आहे. पोवाडा म्हणून तो आता विविध माध्यमातून सादर व्हायला हवा. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- शिवशाहीर राजू राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com