सतेज राजाराम कारखाना

सतेज राजाराम कारखाना

सिंगल फोटो
...

निर्णयाला उच्च न्यायालयात दाद मागणार

सतेज पाटील ः महाडिक भ्याले, पायाखालची वाळू घसरल्यानेच उमेदवार अवैध ठरवले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मैदानात लढायचे असते तर त्यांनी विरोधी उमदेवारांचे अर्ज छाननीत उडवले नसते. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, ते शंभर टक्के भ्याले (घाबरले) म्हणूनच २९ उमेदवारांचे अर्ज छाननीतून उडवले असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘राजाराम’च्या निवडणुकीतील विरोधी गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कायम ठेवला. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.
दरम्यान, ‘‘सभासदांनी साखर कारखान्यात चाललेला गोंधळ पाहण्यासाठी जायचे नाही का? आतापासूनच श्री. महाडिक यांनी राजाराम कारखान्याचे खासगीकरण केले आहे का?, असा सवालही श्री. पाटील यांनी मध्यरात्री कारखान्यात घुसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नावर बोलताना उपस्थित केला. सरकार म्हणून भाजपने या दोन्ही अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. त्यामुळे निकाल काय लागणार हे आम्हाला माहिती होते, असेही ते म्हणाले.’’
श्री. पाटील म्हणाले, ‘‘निवडणूक अधिकाऱ्यांनी २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्यानंतर प्रादेशिक प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केलेल्या अपिलावर सोमवारी सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र, सोमवारी सुनावणी घेतली नाही, त्यांनी एक दिवस उशीरा केला. ज्यादिवशी सुनावणी झाली त्यादिवशी सत्तारुढ गटाच्या वकिलांनी त्यांचे मत द्यावे, अशी मागणी होती. मात्र, या ठिकाणी वेळ काढला. सत्तारूढच्या वकिलांनी एक दिवस वाढवून मागितला आणि त्यांना एक दिवसाची मुदत दिली. त्याच दिवशी निकाल द्यावा, अशी आमची मागणी होती. पण पुढच्याला निशस्त्र करण्यापेक्षा हे २९ लोक रिंगणात उतरून लढाई लढली पाहिजे होती. पण महाडिक यांच्याकडे तेवढे धाडस नाही. त्यांना वाटत असेल आमचे इतर उमदेवार सक्षम नाहीत, पण आमचे ५० उमदेवार सक्षम आहेत. ते निश्‍चितपणे विजयी होणार आहेत. या वेळी सर्जेराव माने आदी उपस्थित होते.
......

अध्यक्षांनी किती वेळा कारखाना पाहिला?

‘जे राजाराम कारखान्याचे नेतृत्व करतात किंवा विद्यमान अध्यक्ष आहेत, ते वर्षभरात किती वेळा कारखाना बघायला गेले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करून प्रसार माध्यमांना द्यावे’, असे आव्हान श्री. पाटील यांनी दिले. कारखान्याचे सभासद राजाराम कारखान्यात काही तरी गोंधळ सुरू आहे, हे पाहण्यासाठी गेले होते. सभासद म्हणून ते कारखान्यात गेले होते. मात्र सभासदांना अडवण्याचा प्रयत्न केला. महाडिक यांनी हिंमत असेल तर ज्या दिवशी उमेदवारांचे रेकॉर्ड बदलले त्या दिवशीचेही फुटेज प्रसारमाध्यमांना द्यावे,‍ असे आव्हान श्री. पाटील यांनी दिले.
..........

अधिकाऱ्यांवर भाजपचा दबाव

‘राजाराम कारखान्यात भाजपचा हस्तक्षेप आहे. दरम्यान, कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेत भाजपचा दबाव होता. सरकार म्हणून भाजपने जिल्हा उपनिबंधक आणि प्रादेशिक साखर सहसंचालक या दोन्ही अधिकाऱ्यांवर दबाव आणला. काल रात्री बारा वाजता निकाल जाहीर करण्याच्या मुदतीचे दहा दिवस संपणार होते, त्याआधीच आमच्या हातात ‘अवैध’चा निकाल लागला. त्यामुळे सुटी असतानाही कार्यक्षम अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत निकाल पोचवण्याचे काम केले. त्या बिचाऱ्यांवर भाजपचा दबाव होता’, असेही श्री पाटील यांनी सांगितले.
....


‘राजाराम’च्या निवडणुकीत आता आमचे २१ चे पॅनेल असेल आणि २९ अवैध उमदेवारसुध्दा या लढाईत असणार आहे. त्यामुळे सत्तारूढच्या २१ लोकांना आमच्या ५० लोकांसोबत लढाई करावी लागणार आहे. सगळे उमेदवार त्यांनी छाननीतून बाहेर केले असले तरीही लोकांच्या मनात महाडिक यांच्याबद्दल राग आहे. पाच गुंठे शेती असणाऱ्या उमदेवाराचा अर्ज छाननीतून बाहेर जात नाही अणि विरोधी गटाकडे सर्व पुरावे असतानाही त्यांना छाननीतून बाहेर काढले जात असल्याची टीकाही श्री. पाटील यांनी केली.
...

* प्रचारासाठी महाडिकांचे घरदार रस्त्यावर

‘कारखान्याच्या २८ वर्षांच्या इतिहासात महाडिकांचे घरदार सभासदांना भेटायला बाहेर पडले आहे. आता त्यांना सभासदांची घरे दिसायला लागली आहेत’, अशी टीकाही श्री. पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com