उमदेवारी अर्ज अवैध

उमदेवारी अर्ज अवैध

लोगो - राजाराम कारखाना निवडणूक

‘ते’ २९ उमेदवार अवैधच
प्रादेशिक साखर सहसंचालकांचा निर्णय; सतेज पाटील गट उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला करारानुसार ऊस पुरवठा केला नसल्यावरून २९ उमेदवारांना अवैध ठरवण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय प्रादेशिक साखर सहसंचाक अशोक गाडे यांनी कायम ठेवला. रविवारी (ता. ९) रात्री उशिरा संबंधित उमेदवारांना याचे निकालपत्र देण्यात आले. आमदार सतेज पाटील गटाने प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या अर्जांची २८ मार्चला छाननी झाली. यात विरोधी गटातील २९ जणांनी कारखान्याला करारानुसार ऊस पुरवठा केलेला नाही. राजाराम कारखान्याचे सभासद असताना इतर कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे, अशी हरकत सत्तारूढ महाडिक गटाने घेतली होती. या हरकतीवर सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी ३० मार्चला विरोधी गटाच्या २९ उमदेवारांना अवैध ठरवले. या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाने एक लाख ३० हजार कागदपत्रांचे पुरावे सादर करत प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली. तसेच, कारखाना प्रशासनाने सभासदांना एक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वेगळे व चुकीचे दाखले दिल्याचे पुरावे सादर केले. ऊस पुरवठा झाला नाही तर साखर कारखान्याने आमच्या बँक खात्यावर उसाचे बिल कसे दिले, असा सवालही यावेळी विरोधी गटाकडून सुनावणीत केला गेला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर रविवारी (ता. ९) रात्री बारा वाजता विरोधी गटातील २९ उमेदवारांना अवैध ठरवत असल्याचा निकाल गाडे यांनी दिला. १७ पानांच्या भरगच्च निकालपत्रात कोणत्या कारणासाठी अर्ज बाद करण्यात आला, यासह दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाचा समावेश आहे.

कार्यक्रम पुढे सुरू राहणार की...?
निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस बुधवार (ता. १२) आहे. त्याच दिवशी निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तत्पूर्वी पाटील गटाकडून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल अपेक्षित आहे; पण १२ एप्रिलपर्यंत उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही तर निवडणूक कार्यक्रम तसाच सुरू रहाणार की यावरील निर्णयापर्यंत स्थगिती मिळणार, याविषयी उत्सुकता आहे.

प्रबळ पुरावे देऊनही २९ उमेदवारांना अवैध ठरवले आहे. अधिकाऱ्यांनी हा निर्णय भाजपच्या दबावाखाली घेतला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
- सतेज पाटील, आमदार

‘ते’ २९ उमेदवार न्यायिक मार्गाने अवैध ठरल्यामुळे आमदार सतेज पाटील यांचा तोल गेला आहे. ते काय करतात आणि काय बोलतात, हे त्यांनाच कळत नाही.
-अमल महाडिक, माजी आमदार
(सविस्तर वृत्त पान २)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com