सोशल मिडीयावरून शेतीचे धडे

सोशल मिडीयावरून शेतीचे धडे

पाऊस पाण्याची माहिती समाज माध्यमातून
शेतकऱ्यांच्या सतर्कतेसाठी उपक्रम; ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचा पुढाकार
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : ‘पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पीकावर फवारणी करू नका.’ ‘भात काढणी असेल तर तातडीने करा.’ हे शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपवर पाठवलेले संदेश आहेत. ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्रातर्फे हे संदेश सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ तालुक्यांच्या ग्रुपवर पाठवले जातात. सुमारे १५ ते २० हजार शेतकऱ्यांपर्यंत हे संदेश जातात. त्यामुळे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळले आहेच. शिवाय उत्पादनातही वाढ होत आहे. एरवी मनोरंजनासाठी सोशल मिडीयाचा वापर होतो मात्र ग्रामीण कृषी मौसम केंद्राने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर केला आहे.
वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले. शेतीचे वेळापत्रक बिघडले. परिणामी शेतकऱ्याचा तोटा वाढला. पूर्वी रेडिओ, दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वातावरणाची स्थिती कळवली जायची. त्यानंतर मोबाईच्या एस. एम. एसचा वापर होऊ लागला. आता व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे. याचा पथदर्शी प्रकल्प ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने केला आहे. या वर्षीपासून त्यांनी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप केले आहेत. त्यांच्याकडे सुमारे ५० ग्रुप आहेत. या शिवाय जी. के. एम. एस फेसबुक पेज आणि ट्विटर हॅटलही आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातील शेतकऱ्यांचे सोशल मिडीया ग्रुपही त्यांना जोडले आहेत. ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे आणि कृषी विज्ञानचे असे सर्व मिळून सुमारे १५ ते २० हजार शेतकरी यांच्याशी जोडले आहेत. त्यांना दर मंगळवारी आणि शुक्रवारी सोशल मिडीयावरून शेतीबाबतचे अपडेट दिले जातात. पुढील दोन तीन दिवसात वातावरण कसे असेल. पिकांची काळजी कशी घ्यायची. ही माहिती दिली जाते. तसेच लावणी पासून काढणीपर्यंत कोणत्या वेळी काय करायचे याचेही मार्गदर्शन दिले जाते. खते कोणती वापरावीत. खतांचे प्रमाण हे देखील सांगितले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळते. उत्पादनात वाढ होते. ऊस उत्पादकाबरोबर द्राक्ष बागायतदारांनाही याचा लाभ होतो. सहयोगी संशोधक संचालक डॉ.आर. आर. सूर्यवंशी, तांत्रिक अधिकारी डॉ. मयुर सुतार, हवामान निरीक्षक अभिषेक पाटील हे या प्रकल्पावर काम करतात.
------------------
चौकट
जनावरांची काळजी
म्हैस, गाय यांच्या पालनाविषयी मार्गदर्शन केले जाते. पशुखाद्य, औषधे याबाबतची प्रबोधन केले जाते. दूध उत्पदकता वाढवण्यासाठी काय केले पाहीजे याबाबतही माहिती दिली जाते. याचा शेतकऱ्यांना लाभ होतो.
------------------
कोट
वातावरणातील बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. मात्र जर या बदलाची माहिती वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली तर संभाव्य नुकसान काही प्रमाण टाळले जाते. तसेच शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते. शेतकऱ्यांकडून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होते.
- डॉ. प्रविण गजभिये, ऑफिसर इंचार्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com