शासन दारी

शासन दारी

Published on

‘शासन आपल्या दारी’च्या खर्चाची ‘उत्‍सुकता''
---
कार्यक्रम दिमाखात, आर्थिक तरतूद मात्र गुलदस्‍त्यात
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्‍थितीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम थाटात पार पडला. शासनाचा कार्यक्रम ‘कॉर्पोरेट’ला शोभेल, असा होऊ शकतो, हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले. जिल्‍ह्याच्या कानाकोपऱ्या‍तून हजारो लाभार्थींना आणण्याच्या व्‍यवस्‍थेपासून खानपानापर्यंत सर्व व्यवस्‍था काटेकोरपणे करण्यात आली होती. मंडपाने तर जिल्‍ह्यानेच नव्‍हे, तर राज्याने लक्ष वेधून घेतले. त्यामुळे साहजिकच या दिमाखदार कार्यक्रमाच्या खर्चाबाबत जिल्‍ह्यासह राज्यातील नेत्यांना उत्‍सुकता लागून राहिलेली आहे.
राज्यात ठिकठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्यात आला. मात्र, कोल्‍हापूरचा कार्यक्रम खूपच भव्यदिव्य झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्‍थिती, कार्यक्रमाच्या तयारीकडे भारतीय जनता पक्षाने फिरवलेली पाठ, एवढेच नव्‍हे तर शिंदे गटाच्याही बहुतांश नेत्यांनी ठेवलेले सुरक्षित अंतर... असे असतानाही कार्यक्रम दिमाखात पार पाडण्याची किमया संयोजकांनी साधली. अधिकारी तर रात्रंदिवस या कार्यक्रमासाठी राबत होते. कोणी बसची व्यवस्‍था, कोणी नाश्‍‍त्याची, तर कोणी डिजिटल फलकांची व्यवस्‍था करण्यात व्यस्‍त होते. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने मंत्रालयातूनच कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र, एवढा मोठा कार्यक्रम असूनही निविदा प्रक्रियेला बगल देण्यात आली. विविध विभागांकडे कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. कोणी फिल्‍म केली, कोणी मंडप, तर कोणी खानपानाची व्यवस्‍था केली. सर्वाधिक खर्चाची चर्चा ही मंडप, वाहतूक व्यवस्‍थेवर झाली. मात्र, हा खर्च नेमका कोणत्या हेडमधून झाला? राज्य शासन यासाठी काही निधी देणार आहे का? जिल्‍हा नियोजन समितीने काही तरतूद केली आहे का? विभागांनी जर खर्च केला असेल तर कोणत्या हेडमधून केला? असे अनेक प्रश्‍‍न अनुत्तरित आहेत.
कार्यक्रमाची जबाबदारी विविध विभागांवर सोपविण्यात आली होती. मात्र, विभागप्रमुखांकडे विचारले असता ते जिल्‍हा प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत. आमच्याकडे दिलेली जबाबदारी पार पाडली आहे, मात्र खर्चाबाबत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळेच कार्यक्रमाचा खर्च व त्याची तरतूद, याबाबत जिल्‍ह्यात मोठी उत्‍सुकता लागून राहिली आहे. खर्चाची माहिती देण्यास जेवढा विलंब होईल, तेवढा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
...

‘शासन आपल्या दारी’ऐवजी ‘जनता आपल्या दारी’ हा इव्‍हेंट घेण्यात आला. सर्व जिल्‍हा प्रशासन कार्यक्रमात दंग असल्याने १५ दिवस सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्‍प झाले. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना ‘खर्च’ करावा लागला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च करून काय मिळाले? हा निधी कोणत्या हेडमधून खर्च करण्यात आला, त्याची निविदा प्रक्रिया कधी झाली? या सर्वांची माहिती जिल्‍हाधिकाऱ्यां‍नी जाहीर करावी.
- राजू शेट्टी, माजी खासदार
..............

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम लोकसहभाग आणि शासकीय निधीतून केला आहे. ज्या ठिकाणी लोकसहभाग कमी मिळाला, त्या ठिकाणी शासकीय निधी खर्च केला. यात लोकसहभाग जास्त आहे.
- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.