परीक्षेच्या तीन महिने आधीच विद्यार्थ्यांच्या हाती वेळापत्रक

परीक्षेच्या तीन महिने आधीच विद्यार्थ्यांच्या हाती वेळापत्रक

शिवाजी विद्यापीठ ... लोगो
...

परीक्षेच्या तीन महिने आधीच
विद्यार्थ्यांच्या हाती वेळापत्रक

दहावी, बारावी परीक्षांच्या धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे पाऊल; अभ्यास, मूल्यांकनाच्या नियोजनाला मिळणार वेळ

संतोष मिठारी, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३१ ः विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेची अधिक चांगली तयारी करता यावी. मूल्यांकन, निकालाच्या प्रक्रियेतील वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांना नियोजन करता यावे, यादृष्टीने शिवाजी विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याचे पाऊल टाकले आहे. ऑक्टोबरपासून होणाऱ्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक जुलैमध्येच जाहीर केले आहे.
कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. त्याचा मूल्यांकन, निकाल जाहीर करण्यासह विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर परिणाम झाला. ते टाळण्यासाठी आणि वेळेत परीक्षा घेण्यासह निकाल जाहीर करण्यासाठी सध्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने विद्यापीठाच्या परीक्षा नियुक्ती समितीने केलेल्या वेळापत्रकाची तपासणी केली. या समितीच्या मान्यतेनंतर परीक्षा मंडळाने यापुढे दहावी, बारावीच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षातील सत्राच्या प्रारंभालाच परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्याची हिवाळी सत्रापासून सुरूवात केली. परीक्षा मंडळाने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा होणार आहेत.
.....

६०० परीक्षा, २ लाख ५० हजार परीक्षार्थी

हिवाळी सत्रात विद्यापीठ कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ६०० परीक्षा घेणार आहे. त्यासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थी परीक्षार्थींची संख्या सुमारे २ लाख ५० हजार इतकी आहे.
...

फेरमूल्यांकनाचा वेळ कमी होणार
सध्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन महिने लागतात. मात्र, परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच निश्‍चित झाल्याने परीक्षा, मूल्यमापनाची प्रक्रिया निर्धारित वेळेत होणार आहे. त्यामुळे साहजिकच फेरमूल्यांकनाचा वेळ कमी होणार आहे.
...

कोट

‘पदवी, पदव्युत्तर परीक्षेच्या तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्याच्या कार्यवाहीचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना अधिक चांगला उपयोग होणार आहे. प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षेच्या तयारीचे, तर कर्मचाऱ्यांना मूल्यमापन, निकाल, फेरमूल्यांकन प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करता येणार आहे.
-डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com