वाढली उष्णता, जनावरांना सांभाळा

वाढली उष्णता, जनावरांना सांभाळा

वाढली उष्णता, जनावरांना सांभाळा
मुदतपूर्व प्रसूतीच्या वाढताहेत घटना : जनावरे दगावण्याचाही धोका
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : वाढत्या उष्णतेचा परिणाम सर्वच घटकांवर होताना दिसत आहे. उष्म्याने माणसाला हैराण केले आहेच पण, जनावरांनाही त्याचा त्रास होताना दिसत आहे. गाभण गाय, म्हशीची मुदतपूर्व प्रसूती होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. शिवाय जनावरे दगावण्याचाही धोका वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. अनेकांनी मुख्य व्यवसाय म्हणून याला पसंती दिली आहे. ग्रामीण भागात काही कुटुंबांचा अपवाद सोडला तर घरटी एक-दोन जनावरे आढळतातच. त्यांच्या दुधांच्या उत्पन्नावर बराचसा चरितार्थ चालवला जातो. महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला आहे. ३८ ते ४० च्या घरात तो खेळत आहे. वाढलेल्या उष्म्याचा परिणाम माणसाबरोबरच जनावरांवरही होताना दिसत आहे.
बहुतांश पशुपालकांचा गोठा स्वतंत्र नसतो. घरातीलच एका खोलीत शक्यतो शेवटच्या खोलीत जनावरे बांधली जातात. त्यामुळे वारा खेळता राहत नाही. त्यातही वर पत्रे घातलेले असतील तर उष्णता अधिक वाढते. त्यामुळे गोठ्यातील वातावरण उष्ण राहत आहे. पूर्वीसारखे जनावरांना बाहेर सोडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी, २४ तास जनावरे गोठ्यातच बांधून राहतात. या साऱ्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.
वाढलेल्या उष्म्यामुळे गाभण जनावरांची मुदतीपूर्वी प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात वासरू, रेडकू दगावण्याची शक्यता अधिक असते. तसेच दुधावरही काही प्रमाणात परिणाम होतो. शिवाय उष्म्यामुळे जनावरे दगावण्याचाही धोका वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांनी वाढत्या उष्म्याचा विचार करून जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.
------------
* अशी घ्या जनावरांची काळजी
- गोठ्यामध्ये थंड हवा खेळती राहावी यासाठी शक्य असल्यास पंखा लावावा.
- हवामानपूरक गोठे असावेत. आतील भिंतींना पांढरा रंग लावावा. छतावर तुरट्या, कडबा, वनस्पतींचा पालापोचाळा अंथरावा.
- आहारात नियमित ३० ते ५० ग्रॅम मिठाचे खडे किंवा खनिजक्षार मिश्रण द्यावे. त्यामुळे उन्हाळ्यात आवश्यक क्षार मिळतात.
- दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास शरीराचे तापमान कमी होते. दूध उत्पादन वाढते.
- जनावरांच्या अंगावर दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाणी फवारावे.
------------
वातावरणातील उष्मा वाढला की जनावराच्या शरीराचे अंतर्गत तापमान वाढते. त्यामुळे गाभण जनावरांची मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका असतो. पशुपालकांनी गोठ्यातील उष्णतेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
- डॉ. सचिन घालवाडकर,
पशुधन विकास अधिकारी, गडहिंग्लज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com