मगरीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

मगरीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

01793
महादेव खुरे

मगरीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दूधगंगा पात्रात ओढून नेले; दत्तवाड-सदलग्याजवळील घटना

कुरुंदवाड, सदलगा, ता. ११ ः दत्तवाड-सदलगा दरम्यानच्या दूधगंगा नदीपात्रात मगरीने सदलगा येथील शेतकऱ्याला ओढून नेले. त्यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. महादेव पुन्नापा खुरे (वय ७२, रा. सदलगा, ता. निपाणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) उघडकीस आली. दरम्यान, या घटनेने दूधगंगा काठावरील मगरींची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उन्हाळ्यात सातत्याने कोरडी पडणाऱ्या दूधगंगा नदीत दोन दिवसांपूर्वी पाणी आल्याने पात्र तुडुंब भरले आहे. महादेव खुरे शुक्रवारी (ता. १०) येथील कंटी भागात आपल्या शेतात काम करत होते. नेहमीप्रमाणे ते नदीत अंघोळीसाठी उतरले. पोहून ते नदीकिनारी येत असताना या परिसरात वावर असलेल्या मोठ्या मगरीने त्यांच्या पायाला धरून पाण्यात ओढत नेले, असे तेथील जमलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेनंतर कालपासून खुरे कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू होती. शनिवारी (ता. ११) सकाळी रमेश प्रधाने यांच्या शेताजवळ नदीपात्रात महादेव खुरे यांचा मृतदेह आढळून आला. सामाजिक कार्यकर्ते सुकुमार उगारे यांनी मृतदेह बाहेर काढला. खुरे यांच्या डाव्या मांडीवर मगरीच्या चाव्याचे व्रण दिसून आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सदलगा पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सदलगा परिसरात दूधगंगेच्या पात्रात मगरींनी उच्छाद मांडला आहे. नदीत विद्युत मोटारपंप सुरू करताना शेतकऱ्यांना अनेकदा मगरीचे दर्शन झाले आहे. काही वर्षांपूर्वी सदलगा येथील प्रदीप इंगळे या तरुणावर मगरीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी प्रदीपने धाडसाने प्रतिकार करत मगरीचे डोळे हाताने काढून तो बचावला होता.
--------
चौकट १
मगरींचा बंदोबस्त कसा करणार?
दत्तवाड-सदलगा परिसरात दूधगंगेच्या नदी पात्रात मगरींची संख्या मोठी आहे. वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. शेतकरी नदी किनाऱ्यावरील मोटारपंप सुरू करावयास जाण्यास भित आहेत. पात्र कोरडे पडल्यानंतर मगरी नागरी वस्तीपर्यंत येतात, तर पात्रातील मगरींचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नसल्याने जीव मुठीत धरूनच शेतकरी नदीत उतरत आहेत. मगरींचा बंदोबस्त कसा करायचा, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
-------
चौकट २
मनुष्यहानीनंतर तरी लक्ष देणार?
यापूर्वीही दूधगंगा नदीतील मगरींनी शेळ्या, मेंढ्या, कुत्री, म्हशी, घोडे आदींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा जीव घेतला आहे. आता एका शेतकऱ्याला मगरीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. आतातरी वनविभाग याकडे लक्ष देणार आहे का, असा प्रश्न दूधगंगा काठावरील शेतकरी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com