स्मार्ट मीटर्सचा बोजा वीज ग्राहकांवर

स्मार्ट मीटर्सचा बोजा वीज ग्राहकांवर

स्मार्ट मीटर्सचा बोजा वीज ग्राहकांवर
प्रताप होगाडे : मोफत दिले जाण्याची जाहिरात खोटी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ : केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने देशभर स्मार्ट मीटर्स अथवा प्रीपेड मीटर्स लावण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यात दोन कोटी २५ लाख ६५ हजार स्मार्ट मीटर्स बसविण्यात येणार आहेत. त्याचा बोजा महाराष्ट्रातील १६ हजार वीज ग्राहकांवर बसणार आहे. त्यांच्या वीज बिलातून ही रक्कम वसुली केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकारांना दिली. ग्राहकांना मीटर्स हे शासनाकडून मोफत दिले जाणार असल्याची जाहिरात केली जात असून, ती पूर्णपणे खोटी आहे, असा दावाही त्यांनी केला.
होगाडे म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन योजनेअंतर्गत २२ कोटी २३ लाख प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. आतापर्यंत १ कोटी ८ लाख मीटर बसविली आहेत. महाराष्ट्रात दोन कोटी २५ लाख ६५ हजार स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. शेती पंप वगळता ग्राहकांना हे स्मार्ट मीटर बसविली जाणार आहेत. स्मार्ट मीटर्स, ट्रान्सफॉर्मर मीटर्स, फीटर मीटर्स व संबंधित सुविधा यासाठी एकूण ३९ हजार ६०२ कोटींच्या योजनेस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ते बसवण्यासाठी ६० टक्के केंद्र शासन देणार आहे. ४० टक्के रक्कम महावितरण कंपनी कर्जरूपाने उभी करणार आहे. पुढील दरवाढ प्रस्तावामध्ये या रकमेचा समावेश असणार आहे. त्यामुळे ही रक्कम ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल केली जाणार आहे.
स्मार्ट मीटर्स पुरवण्यासाठी महावितरणने काढलेल्या निविदेला मंजुरी दिली आहे. संबंधित पुरवठादारांना मंजुरीपत्र दिले आहे. निविदेतील अटी व शर्तीनुसार सुमारे २७ महिन्यांत पुरवठादाराने सर्व मीटर्स बसविण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार हे काम गत डिसेंबर अखेर सुरू होणे अपेक्षीत होते. त्यानंतर पुढे मार्चपासून हे काम सुरू होईल, असे जाहीर केले. पण, अद्याप काही पुरवठादारांकडून पूर्वतयारी सुरू आहे. त्यानंतर येत्या २ ते ३ महिन्यांत हे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पुरवठादारांची यादी पाहिल्यास अदानी, एनसीसी व मॉटेकार्लो हे तिघेही पुरवठादार फक्त विक्रेते आहेत. फक्त जीनस ही एकच पुरवठादार उत्पादक कंपनी आहे, असे होगाडे यांनी सांगीतले.
-------
गळती कमी, वीज चोरीचे काय?
स्मार्ट मीटर्समुळे गळती थोडीशी कमी होऊ शकेल, पण मीटर छे़डछाड व वीज चोरी होऊ शकते. त्यामुळे वीज चोरी थांबवता येत नसेल तर यासाठी केली जाणारी गुंतवणूक व्यर्थ असल्याचे मत होगाडे यांनी व्यक्त केले. सध्या वापरात असणाऱ्या सुमारे अडीच कोटी मीटर्स भंगारात जाणार काय, याची अद्याप स्पष्टता नसल्याचेही त्यांनी सांगीतले.
------
चळवळ उभी करणार
स्मार्ट मीटर ही योजना अदानीसारख्या काही उद्योजकांच्या फायद्यासाठी केली आहे. यामध्ये ग्राहकांचे कोणतेही हित नाही. त्यामुळे यासाठी ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेऊनच चळवळ उभी केली जाणार आहे, असे होगाडे यांनी यावेळी जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com