गळती

गळती

फोटो-87373
-
लोगो : महापालिका

गळतीची डोकेदुखी, वाहते पाणी बेहिशोबी
दुरुस्तीसाठी ठेकेदाराशिवाय नाही पर्याय; महापालिका प्रशासनाने द्यावे लक्ष

कोल्हापूर, ता. २ ः जुन्या वाहिन्या बदलून नवीन तंत्रज्ञानाच्या टाकल्या. त्याला घरगुती जोडणीही दिल्या. पण, त्या वाहिनीला गळती उद्‍भवली तर दुरुस्तीसाठी ठेकेदाराशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत ठेकेदार येत नाही, तोपर्यंत पाणी वाहून जाते. कुणी पाठपुरावा केला नाही तर ती तशीच राहते. ठिकठिकाणी उद्‍भवलेल्या अशा गळतीतून बेहिशोबी पाणी वाहून जात आहे.
‘अमृत’ योजनेतून अंतर्गत वाहिन्या बदलण्याचे काम केले. त्यात मुख्य वाहिनींपासून अंतर्गत भागात टाकलेल्या या वाहिन्या नवीन तंत्रज्ञानाआधारे बसवल्या. पूर्वीच्या वाहिन्यांना जोडामधून गळती उद्‍भवत असल्याने हा जोडच नवीन वाहिन्यांमध्ये नवीन प्रकारे केला. नवीन तंत्रज्ञानाआधारे जोडलेल्या वाहिन्यांची काही दुरुस्ती उद्‍भवल्यास त्या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच दूर कराव्या लागतात. ती यंत्रणा सध्या तरी ठेकेदाराकडे असून, त्याला बोलवल्याशिवाय ती दुरुस्ती होत नाही. संबंधित ठेकेदार वेळेवर जात नसल्याने अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी असलेल्या गळतीतून पाणी वाहून जात आहे. गॅस वा अन्य खोदाईदरम्यान अंतर्गत वाहिन्यांना गळती उद्‍भवत आहे. यासाठी महापालिकेच्या यंत्रणेकडे तक्रार द्यायची, तिथून ती संबंधित ठेकेदाराकडे दिली जाते. त्याच्याकडे असलेल्या तक्रारींमध्ये जी प्राधान्याने सोडवण्यास सांगितले जाते त्या दुरुस्त झाल्यानंतर अन्य गळतींकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणाहून किती पाणी वाहून जाते याचा हिशोबच नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असूनही अनेक भागात कमी दाबाने पाणी मिळण्याच्या तक्रारी केल्या जातात.
अंतर्गत वाहिन्यांबरोबरच घरगुती जोडणीच्या वाहिन्यातूनही गळती उद्‍भवत आहे. अनेकांच्या वाहिन्या जुन्या आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून या तक्रारी दूर केल्या जातात. काही ठिकाणी पीव्हीसीमध्ये टाकलेल्या वाहिन्यांवर पाण्याचा दाब वाढला तर जोड सुटतात व गळती सुरू होत आहेत. यासाठी पाण्याचा वाढलेला दाब कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे स्वतःच्या जोडण्या व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी नागरिकांनी पूर्ण करण्याची गरज आहे.

चौकट
नवीन तंत्रज्ञान केव्हा?
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने नवीन वाहिन्या टाकल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठीचे नियोजनही महापालिकेने करून ठेवायला हवे. ‘अमृत’मधील ठेकेदाराला पुढील पाच वर्षे दुरुस्ती करून द्यायची आहे. त्याच्यापर्यंत माहिती जायला व दुरुस्तीला वेळ लागत असून, त्यातून पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने पुढील पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
..
ठळक चौकट
बदललेल्या अंतर्गत वाहिन्यांची लांबी
-३२० किलोमीटर
शिल्लक कामाची लांबी
-६० किलोमीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com