सोळा गुंठ्यात ८० हजार उत्पन्न

सोळा गुंठ्यात ८० हजार उत्पन्न

02055
कल्याणपूर : येथील अमृत पाटील यांची वांग्याची शेती.
--------------
सोळा गुंठ्यांत ८० हजारांचे उत्पन्न
कल्याणपूरमधील अमृत पाटील यांची प्रयोगशील शेती
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १३ ः पारंपारिकतेला फाटा देऊन शास्त्रोक्त, प्रयोगशील शेती केल्यास उत्पन्नात वाढ होते. याचा प्रत्यय कल्याणपूर (ता. चंदगड) येथील अमृत पाटील या शेतकऱ्याच्या शेतीमुळे आला आहे. त्यांनी १६ गुंठे जमिनीत वांग्याचे उत्पादन घेऊन आतापर्यंत ८० हजारांचे उत्पन्न मिळवले आहे. अजून महिनाभराचा कालावधी असल्याने एक लाखाचे उत्पन्न मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. उत्पादित वांगी कल्याणपूर वांगी या नावाने ते बेळगाव मार्केटमध्ये विकत आहेत.
कल्याणपूरच्या मातीत वांग्याचे पीक चांगल्या प्रकारे येते. येथे पिकलेल्या वांग्यांना विशिष्ट प्रकारची चव आहे. वांगी उत्पादनाचे गाव म्हणून गावाची खरी ओळख आहे. अलीकडे पाण्याची सोय झाल्याने बहुतांश शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे वांगी उत्पादनाचे क्षेत्र कमी झाले आहे. अमृत पाटील या युवा शेतकऱ्याने ऊस शेतीला पर्याय म्हणून पुन्हा वांगी उत्पादनाचा मार्ग स्वीकारला आहे. कुटुंबीयांच्या मदतीने यावर्षी त्यांनी १६ गुंठे जमिनीत मांजरी जातीच्या वांग्याच्या रोपांची लावण केली आहे. नांगरट व कोळपणी झाल्यानंतर शेणखत टाकून गादीवाफ्यावर १ डिसेंबरला रोपांची लावण केली. १५ दिवसांतून एक वेळ पाणी दिले. तीन हजार रोपे तयार झाली आहेत.
महिनाभरापासून वांग्यांची काढणी सुरू केली आहे. काढलेल्या वांग्यांची बेळगाव मार्केटमध्ये घाऊक किमतीने विक्री केली जात आहे. कल्याणपूर वांगी या नावाने ते वांग्यांची विक्री करत असल्याने मागणी चांगली आहे. उत्पादन खर्च अत्यल्प असून आतापर्यंत ८० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. वांग्यांची आठवड्यातून दोन वेळा काढणी केली जाते. वांग्यांची लावण मोठ्या प्रमाणावर असल्याने अजून महिनाभराचा कालावधी असल्याने अंदाजे लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. केवळ १६ गुंठ्यांत लाखोंचे उत्पन्न मिळवून अमृत पाटील यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांसमोर भाजीपाला उत्पादनाचा नवा आदर्श ठेवला आहे.
----------------
ऊस पिकाचा वाढता उत्पादन खर्च, रोगराई, पाण्याची समस्या यांचा विचार केला तर उसाची शेती करणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे ऊस शेतीला पर्याय म्हणून वांगी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला शेतीत थोडे कष्ट जास्त असले तरी चांगले उत्पन्न मिळते. मला १६ गुंठे जमिनीत वांग्यापासून आतापर्यंत ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. अजून तोडणी सुरू असल्याने अंदाजे लाखाचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.
-अमृत पाटील, शेतकरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com