पत्र्याचे शेड ठरताहेत धोकादायक

पत्र्याचे शेड ठरताहेत धोकादायक

02058
कोवाड : येथील श्रीराम विद्यालयाच्या इमारतीवरील पत्र्याचे छत उडून रस्त्यावर पडले आहे.
----------
पत्र्याचे शेड ठरताहेत धोकादायक
कमी खर्चामुळे ग्रामीण भागात पसंती : वादळी पावसात जाताहेत उडून
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १४ : ग्रामीण भागात विशेषतः पत्र्यांच्या शेडची संख्या जास्त आहे. कमी खर्चात निवारा होत असल्याने बहुतांश लोकांची पत्र्यांच्या शेडला अधिक पसंती आहे. लोखंडी अॅंगलवर सिमेंट व गॅलवनचे पत्रे मारून निवारा तयार केला जातो. पण, वादळी वाऱ्यात या पत्र्याचे शेड आता नुकसानीसह धोकादायक ठरू लागली आहेत. वादळी पावसात अनेक गावांतून पत्र्याची शेड उडून गेल्याच्या घटना घडल्याने शेडमध्ये राहणाऱ्या लोकांत भीती निर्माण झाली आहे.
यावर्षी एप्रिलच्या अखेरीपासून वळिवाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट व वादळी पाऊस असे स्वरूप असल्याने घर व पत्र्यांच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. जेथे पाऊस पडतो तेथे जोरदार वादळ येत आहे. नेहमीपेक्षा यावर्षी वादळाचा वेग मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वीस दिवसांत वादळी पावसात अनेकांची पत्र्यांची शेड उडून गेली आहेत. स्लॅबची गळती थांबवण्यासाठी उभी केलेली पत्र्याची शेडही वादळात उडून जात आहेत. वादळामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची मोडतोड झाली आहे. झाडे मोडून पडली आहेत. गवताच्या गंज्या उडून गेल्या आहेत. त्यामुळे कोटीच्या घरात लोकांचे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग इतका भयानक होता की, अनेकांच्या घरावरील पत्र्यांची शेड छतासह उडून दुसऱ्यांच्या घरांवर, गाड्यांवर, रस्त्यांवर पडली आहेत. सुदैवाने यामध्ये कुठेही जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या नसल्या तरी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
मांडेदुर्ग येथे एकाच्या घराचे पत्र्याचे छत दुसऱ्याच्या घरावर पडले. तेऊरवाडीत ग्रामपंचायतीच्या इमारतीवरील पत्र्याचे छत शेजारच्या दुकानावर पडले. कोवाड येथील श्रीराम विद्यालयाच्या ग्रंथालयाच्या इमारतीवरील पत्र्याचे छत रस्त्यावर पडले. डॉ. अमोल पाटील यांचे पत्र्याचे छत शंभर फुटांवरील दुसऱ्याच्या पत्र्याच्या शेडवर पडले. पत्र्याची शेड, पत्र्याचे छत आणि सुटे पत्रे उडून गेल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत. हवेत उडून गेलेल्या पत्र्यांमुळे नुकसान झाले आहे. यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. वादळी पाऊस सुरू झाला की, आता पत्र्याच्‍या शेडमधील लोकांत भीती निर्माण होत आहे. वादळाचा वेग जास्त असल्याने लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. पत्र्याची शेड सुरक्षित व मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. वादळी पाऊस सुरू झाला तर प्रवाशांनी सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेण्याची गरज आहे.
--------------
दृष्‍टिक्षेपात उपाययोजना
पत्र्याची शेड सुरक्षित करण्यावर भर दिला पाहिजे.
प्रत्येक गावात पत्र्याची शेड व छतांची संख्या जास्त आहे.
वादळी पावसाचा विचार केला तर आता पत्र्याची शेड व छतांच्या मजबुतीवर भर दिला पाहिजे.
वादळी पाऊस सुरू झाल्यानंतर लोकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com