
कोल्हापूर-मुंबईमध्ये रंगणार लढत
कोल्हापूर-मुंबईमध्ये रंगणार लढत
पॅकर्स क्लब क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना
कोल्हापूर, ता. ४ : पॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व पय्याडे इंटरनॅशनल मुंबई संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (ता. ५) दुपारी १ वाजता शास्त्रीनगर मैदानावर अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अंतिम सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी शुभेद्रु भांडारकर व माजी सेक्रेटरी रियाज बागवान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पहिला उपांत्य सामना, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना नाशिक संघाने ९.४ षटकांमध्ये सर्वबाद ४९ धावा केल्या. त्यामध्ये एकाही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. कोल्हापूर संघाकडून रवी चौधरी चार, श्रीराज चव्हाण तीन, तर अभिजित लोखंडे यांनी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोल्हापूर संघाने ६.५ षटकांमध्ये तीन बाद ५२ धावा करून हा सामना सात गडी राखून जिंकला. नाशिक संघाच्या सुयोग मंडलिक याने तीन बळी मिळविले. ‘सामनावीर’ पुरस्कार घाटगे उद्योग समूहाचे सतीश घाटगे यांच्या हस्ते कोल्हापूर संघाच्या रवी चौधरी याला देण्यात आला.
दुसरा उपांत्य सामना पी. वाय. सी, पुणे विरुद्ध पय्याडे इंटरनॅशनल मुंबई या दोन संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाने निर्धारित २० षटकांमध्ये सहा बाद १२२ धावा केल्या. त्यामध्ये आदित्य लोंढे ३३ व श्रेयस वाळेकर यांनी ३२ धावा केल्या. मुंबई संघाकडून यश गढीया व आदित्य याधव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई संघाने १५.३ षटकांमध्ये चार बाद १२८ धावा करून हा सामना सहा गडी राखून जिंकला. त्यामध्ये हर्ष राणे ५१ आणि ओंकार मळेकर यांनी २९ धावा केल्या. पुणे संघाच्या यश माने याने तीन बळी घेतले. ‘सामनावीर’ पुरस्कार प्रसाद पत्की यांच्या हस्ते मुंबई संघाच्या हर्ष राणे याला देण्यात आला.