
पट्टणकोडोलीतील गावखणीची दूरवस्था
पट्टणकोडोलीतील गावखणीची दुरवस्था
भक्तांतून नाराजी; कचरा, सांडपाण्यामुळे प्रदूषित
पट्टणकोडोली, ता. १२ : येथील गावखणीची दुरवस्था झाली आहे. विविध धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भक्तांतून नाराजी व्यक्त होते आहे.
गावाला धार्मीक महत्त्व आहे. वर्षभरात राज्यात लाखो भाविक विविध धार्मिक कार्यक्रमासाठी गावात येतात. गावात प्रवेश केल्यानंतर शाहूकालीन गावखण नजरेस पडते. एकेकाळी या गावखणीचा आधार गावाला होता. मात्र कालांतराने ती दुर्लक्षित होत गेली. कचरा, सांडपाणी यामुळे ही खण दूषित होत आहे. खण स्वच्छ व्हावी यासाठी बऱ्याच वेळेला आवाज उठवला. ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी पाऊल उचलले. मात्र ठोस कार्य न केल्याने ती प्रदूषण मुक्त झाली नाही.
सध्या खणीच्या पाण्यावर परजीवी वनस्पतींचे आच्छादन निर्माण झाले आहे. पाण्याची दुर्गंधी वाढू लागली आहे. खणीला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबरच गावातील प्रवेशही नयन मनोहर अशा वातावरणाने होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ठोस कारवाईसह स्वच्छता करणे गरजेचे आहे.
---------------------------------
अनेक वर्षापासून परंपरागत पद्धतीने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून अनेक भक्तमंडळी धार्मिक विधीसाठी येथे येतात. पण येथील खणीची अवस्था अशी आहे की यातील पाणी पूजनासाठी घेताना त्यावरील तवंग बाजूला करावा लागतो. येणारे भक्त नाराज होतात.
-शैलेश शेळके, सामाजिक कार्यकर्ते