
शांत, शांत पन्हाळा......
परीक्षा, संपामुळे
पन्हाळागड शांत शांत
पन्हाळा ः चार दिवसांपासून पन्हाळगडी थंडगार वारं सुटलंय.. दुपारी आणि रात्री गरम होते आहे; पण सकाळी आणि संध्याकाळी सुसाट वाऱ्यामुळे गडावरचं वातावरण बदलत आहे. या वातावरणाचा आस्वाद घ्यायला परीक्षांमुळे पर्यटकच नाहीत. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पन्हाळगड शांत बनलाय. मार्च तसा कडक उन्हाचा. चार दिवसांपासून पन्हाळगडी भन्नाट वारा सुटलाय.. सायंकाळी धुक्याचे थरावर थर येताहेत.. आकाश ढगांनी भरून जातंय. रात्री आकाशात चांदण्याही दिसेनाशा होताहेत. दूरवर विजांचा लखलखाट होतोय आणि पाऊस पडतोय की काय असे वातावरण बनते आहे; पण भरारत येणारा वारा ढगांना पांगवतोय आणि पुन्हा उकाड्याचा सुरुवात होते आहे. पन्हाळगडी नोकरदारासह पर्यटक नसल्याने गड शांत शांत बनला आहे.शासकीय कर्मचारी संपाचा फटका पक्षकार, हॉटेल, चहागाडी तसेच छोट्या व्यावसायिकांना बसला असून कधी संप मिटतो, परीक्षा संपताहेत आणि गड पर्यटकांनी फुलतो याकडे गाईडसह सर्वांचे लक्ष आहे.