
क्षारपड मुक्तीचे काम मानवी श्रमाचे उदाहरण
क्षारपड मुक्तीचे काम मानवी श्रमाचे उदाहरण
राजा शिरगुप्पे; शिरोळ-नृसिंहवाडीतील २५० एकर सर्व्हेचा प्रारंभ
शिरोळ, ता. १४ ः क्षारपड होऊन नापिक बनलेल्या जमिनीला पुन्हा हिरवेगार करण्याचे काम उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे. यामुळे माझ्या दृष्टीने क्षारपड मुक्तीचे काम म्हणजे मानवी श्रमाचे अद्भूत उदाहरण आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी काढले.
(कै.) पी. के. माने सर क्षारपड जमीन सुधारणा व कृषी पूरक उद्योग सहकारी संस्था मर्यादित शिरोळ, म्हाळसाकांत सहकारी सच्छिद्र पाईपलाईन संस्था शिरोळ नृसिंहवाडीतर्फे शिरोळ नृसिंहवाडी हद्दीतील २५० एकर क्षेत्रावर सर्व्हे कामाचा प्रारंभ केला. यावेळी ते बोलत होते.
गणपतराव पाटील म्हणाले, ‘आपली जमीन क्षारपड मुक्त व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. ही बाब खरोखरीच कौतुकास्पद आहे. श्री दत्त साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी सर्व ती मदत केली जात आहे. आतापर्यंत साडेसात हजार एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.’
मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना व इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे यांनी योजनेची माहिती दिली. दत्तचे संचालक दरगु गावडे, हसन देसाई, पवन शेट्टी- नृसिंहवाडी यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून प्रारंभ केला. स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग माने यांनी केले. आभार प्रकाश माने यांनी मानले. नगरसेवक श्रीवर्धन देशमुख, रघुनाथ माने, डी. आर. माने, कमल माने, अशोक माने, तात्यासो माने, सुनील देशमुख, भीम गावडे, सयाजी माने, आनंदराव माने, नरेंद्र माने आदी उपस्थित होते.