शिरोली : यात्रा २

शिरोली : यात्रा २

उरूस, यात्रेचे बदलते स्वरूप,
नागरिकांचा वाढला हुरूप
शिरोली पुलाची येथे पारंपरिक शिवजयंती, श्री काशिलिंग बिरदेव यात्रा व पीर अहमदसाहेब आणि पीर बालेचाँदसाहेब उरूस एकत्रित भरविण्याच्या संकल्पनेमुळे उत्सवास भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. तीन दिवस चालणारा उरूस व दोन दिवस चालणारी यात्रा व शिवजयंती यामुळे पाच ते सात दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उरूस व यात्रेचे बदलते स्वरूप सर्व नागरिकांच्या उत्साहास उधाण देणारे आणि उत्साह वाढवणारे आहे.
-युवराज पाटील


येथील ग्रामदैवत म्हणून काशिलिंग बिरदेवाची ओळख आहे. परंतु, पूर्वीपासून फक्त धनगर समाजातर्फे तीन वर्षांतून एकदाच जळाची यात्रा भरविली जायची.
तर प्रत्येक वर्षी पीर अहमदसाहेब व पीर बालेचाँदसाहेब यांचा उरूस सर्व शिरोलीकर साधेपणाने साजरा करत. शेतसारा वसुलीच्या वेळी ठराविक आणि उरुसासाठी वर्गणीरूपाने वसूल होते. त्यातूनच उरुसाचे गंध, गलेफ, नैवेद्य व आतषबाजी असे कार्यक्रम पार पाडले जायचे.
शिरोलीचे गावकामगार सर्जेराव दादा पाटील यांनी सर्वधर्मातील लोकांना एकत्रित करून पहिला उरूस केल्याचे सांगितले जाते. गावाच्या दक्षिणेस महामार्गालगत पंचगंगा नदीकाठावर असणारे पीर बालेचाँदसाहेब हे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाते. गावाच्या पश्‍चिमेस पंचगंगा नदीकाठावर पीर अहमदसाहेब हे भाविकांचे दुसरे श्रद्धास्थान आहे. आजही उरुसाच्या दिवशी होणाऱ्या‍ गंध, गलेफाचा पहिला मान गावातील पोलिसपाटील घराण्यालाच आहे. पोलिसपाटील घराण्याचे सुरेश पाटील व राजेश पाटील हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
उरूस भरविण्याची जबाबदारी गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या‍ संघटनेची. जोतिबाची यात्रा संपल्यानंतर येणाऱ्या‍ पहिल्या बुधवारी पीर अहमदसाहेब यांना गंध व गलेफ व शुक्रवारी शर्यती, कुस्त्यांचे मैदान भरवून उरुसाची सांगता व्हायची. शर्यती हे उरुसाचे मुख्य आकर्षण असायचे. काळाच्या ओघात गावात दोन मतप्रवाह निर्माण झाले. उरुसाप्रमाणे ग्रामदैवत काशिलिंग बिरदेवाच्या यात्रेचे प्रतिवर्षी आयोजन झाले पाहिजे, ही संकल्पना युवकांनी रुजविली. यातूनच उरुसाला जोडूनच शनिवार व रविवारी यात्रा होऊ लागली. रविवारी काशिलिंग बिरदेवाला पेहराव, पालखी मिरवणूक व नैवेद्य करून उरूस व यात्रा यांची सांगता होऊ लागली. यात्रा व उरुसाची तारीख निश्चित करताना पारंपरिक शिवजयंतीची तारीख पाहून निश्चित केली जात आहे. शिवजयंतीमुळे गावातील वातावरण शिवमय असते तसेच तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेले असते. यात्रा व उरूस भरविण्याची जबाबदारी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेकडे देण्याऐवजी ग्रामपंचायतीने स्वतःकडे घेतली. ग्रामपंचायत व यात्रा समितीतर्फे लोकवर्गणी जमा करून पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचात निवडणुकीतील सत्तांतरानंतर महाडिक आघाडीने यात्रा उरूसास लोक वर्गणी जमा न करण्याचा निर्णय झाला. वर्गणीत घेतली नाही तरी यात्रा उरसातील कोणताही कार्यक्रम केलेला नाही. शर्यतीत घोडा व बैल या प्राण्यांना होणारी मारहाण, त्यामुळे शासनाने घेतलेली बंदी यामुळे शर्यतीचे प्रस्थ बंद झाले होते; मात्र या शर्यती पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर म्हशी पळवणे, रेडकू पळवणे, मेंढरू पळवणे अशा विविध शर्यतीचे आयोजन ही यात्रा समितीतर्फे करण्यात आले आहे. काही वर्षापासून कुस्त्यांचे जंगी मैदान यात्रा उरुसाचे मुख्य आकर्षण बनले आहे. शिरोलीतील कुस्ती मैदान म्हणजे पैलवान व कुस्ती शौकिनांसाठी परवणी ठरत आहे. गेल्या वर्षीपासून गुरुवार ते रविवार सलग चार दिवस रोज रात्री करमणुकीच्या कार्यक्रमांची भर पडली आहे.

चौकट
सहाव्या दिवशी बैलगाडी शर्यती
परंपरेला आधुनिकतेची सांगड घालत जुन्या-नव्या मतांचा एकत्रित विचार जोपासत कळत-नकळत यात्रा- उरसात सकारात्मक बदल घडत आहेत. वाद टाळून सर्वांच्याच विचारांची धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या शिरोलीकरांच्या प्रयत्नामुळे शिरोली गाव नवा आदर्श निर्माण करत आहे. त्यामुळे यात्रा उरुसाचे बदलते स्वरूप हवेहवेसे वाटणारे आहे. यावर्षी सोमवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून यात्रा उरूसास सहाव्या दिवसाची जोड दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com