World Earth Day 2024 : झाडांची गर्द सावली,भूजल पातळी वाढली अन् जमीन धूप थांबली..!

World Earth Day 2024 : शास्त्रशुद्ध पद्धतीने लावलेल्या झाडांमुळे गर्द सावली तर मिळतेच शिवाय परिसरातील भूजल पातळीही वाढली आहे.
World Earth Day 2024
World Earth Day 2024esakal

World Earth Day 2024 : तब्बल तेरा वर्षांपूर्वी हरित कोल्हापूरचे ध्येय बाळगून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि पर्यावरणप्रेमींच्या पुढाकाराने राजाराम कॉलेज परिसर व प्रिआयएएस ट्रेनिंग सेंटर परिसरात लावलेल्या झाडांची फळे आता चाखायला मिळू लागली आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका कमी करण्यासाठी उचललेले हे पाऊल एक आदर्श ठरत आहे. या परिसरात शास्त्रशुद्ध पद्धतीने लावलेल्या झाडांमुळे गर्द सावली तर मिळतेच शिवाय परिसरातील भूजल पातळीही वाढली आहे.

झाडांची मुळे घट्ट रोवली गेल्याने जमिनीची धूप थांबली. अर्थातच जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्याचे प्रमाणही वाढले. यामुळेच या परिसरातील भूजल पातळी अठरा ते वीस फुटांपर्यंत वाढली आहे.

‘सकाळ’सोबत या परिसरात वृक्षारोपण करणाऱ्या कित्येकांनी ही झाडे आता वाढली असल्याचे आवर्जून कळवत भूजल पातळी वाढल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. २०१० मध्ये विविध संस्था संघटना आणि सामान्य कोल्हापूरकरांनी वृक्षारोपणासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घ्यावा, असा आग्रह धरला.

World Earth Day 2024
World Earth Day 2024 : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणपूरक वस्तूंचा घेऊ ध्यास अन् प्लॅस्टिकला करूयात हद्दपार

या पार्श्‍वभूमीवर पर्यावरणप्रेमी संस्था संघटनांसह हरित कोल्हापूरसाठी पुढचे पाऊल उचलायचे ठरवले. झाडे लावण्यासोबत संगोपनावर आणि त्यासाठीच्या जाणीव जागृतीवर अधिक भर दिला गेला. व्यवस्थित लक्ष दिल्यास वृक्षारोपण यशस्वी होते त्याच खड्ड्याच नवे झाड असा प्रकार करावा लागत नाही, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.

केवळ झाडे लावली म्हणजे काम संपले, अशी कोल्हापूरकरांची भावना कधीच नव्हती. मात्र, आपल्या हातांनी जितकी झाडे लागली, त्या झाडांची जपणूकही झाली पाहिजे, यावर ‘सकाळ’सोबत पर्यावरणप्रेमींनी भर दिला. आपण लावलेल्या रोपाची योग्य वाढ झाली आहे का, झाली नसेल तर त्यासाठी काय करायला हवे, यासाठी कृतिशील पाऊल उचलले. याचेच फळ म्हणून परिसरातील जमिनीची धूप थांबली, भूजल पातळीतही विक्रमी वाढ झाली. कृतिशील उपक्रमातून नक्कीच सकारात्मक बदल घडतात, याचेच हे एक उत्तम उदाहरण.

शास्त्रशुद्ध मॉडेल

‘सकाळ’ने वृक्षारोपणासाठी जागांची पाहणी सुरू केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरने स्वतःहून जागा देण्याची संमती दिली. साहजिकच या जागेवर शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षारोपण झाले. रोपांची निवड, खड्डयांचे आकार यापासून ते दोन झाडांमधील अंतर किती असावे, याचा सर्वांगीण विचार येथे केला. त्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करून घेण्यात आला. साहजिकच येथे होणारे वृक्षारोपण सर्वांसाठी मॉडेल ठरले आहे.

‘सकाळ’च्या पुढाकाराने येथे वृक्षारोपण केल्यामुळे घनदाट जंगलच तयार झाले आहे. त्यामुळे येथे कोणताही विकास प्रकल्प आला नाही. झाडांमुळे जमिनीची धूप थांबली त्यातून भूजल पातळीही १८ ते २० फुटांपर्यंत वाढली आहे. येथे पक्ष्यांची संख्याही वाढली आहे.

- संजीव चिपळूणकर, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com