आटपाडी (सांगली)- दिघंची ते हेरवाड राज्यमार्गाचे काम करणाऱ्या राजपूत कंपनीने अवजड वाहतूक केल्यामुळे शेटफळे करगणी रस्ता खराब झाला आहे. तो "त्यांनीच' दुरुस्त करावा, या मागणीसाठी मनसेने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या डंपर, पोकलानची आणि कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पाचजणावर आटपाडी पोलीस ठाण्यात मनसेच्या सहा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक अरुणकुमार रेड्डी यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
राज्य महामार्ग नंबर 153 याचे काम गेली दीड वर्षे सुरू आहे. दिघंची आटपाडी लेंगरेवाडी शेटफळे या गावावरून हा रस्ता जातो. रस्त्याच्या कामासाठी खडी आणि मुरूमाची अवजड वाहतूक शेटफळे करगणी रस्त्यावरून केली होती. त्यामुळे हा रस्ता खराब झाला होता. तो संबंधित कंपनीने करावा, अशी मागणी मनसेने केली होती.
आज सकाळी मनसेचे तालुक्यातील कार्यकर्ते शेटफळे येथील जोगेश्वरी मंदिर चौकात आले होते. तेथे त्यांनी घोषणाबाजी केली. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या डंपरच्या काचा फोडल्या. तसेच पोकलेनच्या काचाही फोडल्या. यानंतर मनसेचे कार्यकर्ते कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे कार्यालयाची नासधूस आणि तोडफोड केली. आणि यानंतर कार्यकर्त्यांनी पोबारा केला. यासंबंधी अरुणकुमार रेड्डी यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात मनसेचे राजेश जाधव (शेटफळे), अमर पवार (पात्रेवाडी) यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना गाड्यांची आणि कार्यालयाची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पन्नास हजाराचे रुपये नुकसान झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचीही ही नोंद केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.