'निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं'
मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष वाढला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले असून न्यायालयाकडून निर्णय आल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णय प्रक्रियेवर आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत बोलत होते.
राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दिरंगाई अनाकलनीय आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे काय चाललंय हेच कळत नाही. राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. न्यायालाकडून निकाल येईल असं अपेक्षित होतं. पण राज्यातील हा सत्तासंघर्ष फारच लांबलचक आणि गुंतागुंतीचा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले की, निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडही होऊन गेलेली आहे. पण आता या घटना पुन्हा मागे घेता येणार आहेत का, असंही त्यांनी विचारलं आहे.
दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाकडून कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित करत, पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही, असा युक्तिवाद केला. तर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, या प्रकरणांचा निकाल आपणच द्यावा, मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची गरज नाही, असं मत मांडलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.