सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - रविकांत तुपकर

Ravikant-Tupkar
Ravikant-Tupkar

सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याकडे यंदाच्या हंगामाची ‘एफआरपी’ची ७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

तुपकर म्हणाले, ‘‘कारखानदार दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. एफआरपी देण्यात अडचण आहे, तर सरकारने मदत करावी. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वारणेच्या सभेत साखरेचा दर ३४०० रुपये क्विंटलपर्यंत स्थिर ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते; पण आज २९०० रुपयांवर साखर आहे.

राज्याच्या एकूण थकीत एफआरपीच्या तुलनेत एकट्या सोलापुरात एफआरपीची रक्कम हजार कोटींच्या घरात आहे. थकलेल्या बिलावर शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजाप्रमाणे पैसेही मिळाले पाहिजेत.’’ 

कोल्हापुरात ११ साखर कारखान्यांनी एफआरपी दिली. त्यांना जमते मग अन्य कारखान्यांना का जमत नाही. सरकारला सध्या केवळ कारखानदार आणि शेतकरी यांच्यात भांडण लावायचे आहे.

साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीबाबत घेतलेली भूमिका आणि सरकारकडून कारवाईबाबत होत असलेली चालढकल आम्ही सहन करणार नाही. त्याच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (ता. २८) साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही तुपकर यांनी सांगितले.

जिरायती शेतीला हेक्‍टरी किमान ५० हजार आणि बागायती शेतीला एक लाख रुपयांची भरपाई मिळायला हवी. सरकार पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर बोजा चढवत आहे. संपूर्ण कर्जमाफी हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. 
-  रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com