"नगररचना'च्या पुनर्रचनेसाठी आयुक्तांना अहवाल

Report to the Commissioner for "City Planning" restructuring
Report to the Commissioner for "City Planning" restructuring

नगर : नगररचना विभागातील 13 अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांपूर्वी एकाच वेळी तडकाफडकी बदल्या झाल्याने नगररचना विभागात निर्माण झालेल्या अडचणींविषयी आज नगररचनाकार राम चारठाणकर यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्यासमोर भूमिका मांडली. त्या संदर्भातील फेरअहवाल चारठाणकर यांनी लिखित स्वरूपात मांडला. नगररचना विभागातील मंजूर पदे, रिक्त पदे व उपलब्ध मनुष्यबळ, तसेच त्यांना असलेल्या तांत्रिक अडचणी, यांविषयीचा सविस्तर अहवाल दिला. 

तांत्रिक मनुष्यबळाअभावी महापालिकेतील नगररचना विभागाचा कारभारच कोलमडला असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी "सकाळ'मधून प्रकाशित झाले होते. या विभागात फायलींच्या ढिगाऱ्यात वाढच होत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे. त्यावर "सकाळ'ने आवाज उठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेत, "नागरिकांच्या कामांची गैरसोय होणार नाही. नगररचना विभागातील वस्तुस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल,' अशी ठाम ग्वाही "सकाळ'शी बोलताना दिली होती. 

दरम्यान, त्यानुसार जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त द्विवेदी यांनी विभागाची माहिती मागविली होती. नगररचनाकार चारठाणकर यांच्याशी त्यांनी चर्चाही केली होती. त्यानुसार आस्थापनाप्रमुख मेहेर लहारे यांनी विभागातील तांत्रिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली. विभागप्रमुख असलेल्या नगररचनाकार चारठाणकर यांनीही तांत्रिक माहिती आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. तांत्रिक माहिती व शिक्षण असलेले किमान चार अधिकारी विभागात पुन्हा द्यावेत, अशी स्पष्ट मागणीच चारठाणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील निर्णयाने नगररचना विभागाची तीन महिन्यांपासून तारांबळ सुरू आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी बदलून आलेल्या एकाही अधिकारी- कर्मचाऱ्याला नगररचना विभागाचे आकलनच होत नाही. परिणामी, फायलींचा निपटारा होण्याऐवजी रोज नव्या फायलींची भर पडत आहे. त्यातच, नव्याने बदलून आलेल्या विभागातील चार कर्मचाऱ्यांनी पुन्हा मूळ जागी बदली करण्याची विनंती केली आहे. त्यांचे लिखित स्वरूपातील अर्जही चारठाणकर यांनी आयुक्तांना सादर केले आहेत. 


सहायक नगररचनाकाराची तीन पदे 
नगर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आस्थापना सूचीनुसार नगररचना विभागात किमान तीन "सहायक नगररचनाकार' असावेत, असे आकृतिबंधातच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आज वैभव जोशी हे एकमेव सहायक नगररचनाकार आहेत. त्यामुळे कामाचा उरक वाढण्यासाठी अजून किमान एका सहायक नगररचनाकाराची गरज आहे. एखाद्या अधिकाऱ्यास अतिरिक्त पदभार देऊन ही अडचण सुसह्य करावी, अशी गळ नगररचनाकार चारठाणकर यांनी आयुक्तांना घातली आहे. याशिवाय ट्रेसर व वास्तुशास्त्रीय आरेखक परीक्षा उत्तीर्ण झालेले किमान तीन अधिकारी द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

चार अधिकाऱ्यांची मागणी 
नगररचना विभागातील सद्यःस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे आज दिला. तांत्रिक मनुष्यबळ अत्यंत तोकडे असल्याने, यामुळे निर्माण झालेल्या अडचणीही मांडल्या. किमान शैक्षणिक पात्रता व विभागात काम करण्याचा अनुभव असलेले कोणतेही चार अधिकारी द्यावेत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. असे झाले तरच कामास उरक वाढेल, असेही त्यांना सांगितले. 
- राम चारठाणकर, नगररचनाकार, महापालिका 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com