महाराष्ट्राचा "रॉबिनहूड' उपेक्षितच 

महाराष्ट्राचा "रॉबिनहूड' उपेक्षितच 

संगमनेर : ब्रिटिशांविरोधात उठाव करून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिवीर भागूजी नाईक यांचा पराक्रम काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिला. सिन्नर तालुक्‍यातील नांदूर शिंगोटे येथील उजाड माळरानावर भागूजी यांच्या स्मृतिस्थळाजवळ राहणारे त्यांचे तिसऱ्या पिढीतील वंशज हलाखीचे जीवन जगत आहेत. 

संगमनेरहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60ने नाशिकला जाताना वाटेत नांदूर शिंगोटे लागते. गावाच्या प्रवेशद्वारावरील भागूजी नाईक या नावाने येथील प्रसाद चंद्रशेखर कानडे या महाविद्यालयीन युवकाची उत्सुकता चाळवली. भागूजी नाईक यांच्या वारसांचा शोध घेतानाच, त्यांची सद्यःस्थिती त्याने जाणून घेतली. 1857च्या बंडापूर्वी ब्रिटिशांच्या नाकीनऊ आणणाऱ्या या योद्‌ध्याविषयी माहिती घेण्यासाठी त्याने वृत्तपत्रातील कात्रणे, नाशिक व नगर जिल्ह्याचे गॅझेटियर, खानदेशातील मॅजिस्ट्रेटचा पत्रव्यवहार, काही लिखित साहित्याचा धांडोळा घेतला. तत्कालीन संगमनेर परगण्यातील नाशिक, नगर व पुणे प्रांतात ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरोधात झालेल्या बंडात भागूजी नाईक यांचा सिंहाचा वाटा होता. भागूजी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी, भिल्ल समाजाने ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. 
पुण्याच्या बाजूला उमाजी नाईक, तर उत्तरेकडे राघोजी भांगरे हे बंडाचे नेतृत्व करीत होते. नांदूर शिंगोटे येथे 4 ऑक्‍टोबर 1851 रोजी भागूजी नाईक यांच्याबरोबर झालेल्या धुमश्‍चक्रीत ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्यम हेनरी मारला गेला. भिल्लांच्या टोळीने त्याचा अंत्यविधी करून त्याची समाधीही बांधली. 

ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात वजीरखेडा येथील लढाईत भागूजी यांचा भाऊ महिपती धारातीर्थी पडला. 11 एप्रिल 1858 रोजी मेजर इव्हान्सन आणि कॅप्टन बर्च यांनी भागूजी यांच्या टोळीवर अकस्मात हल्ला करून 400 भिल्ल स्त्रिया पकडल्या. अंभोरे येथील लढाईत त्यांचा एकमेव पुत्र यशवंत यास वीरमरण आले. 11 नोव्हेंबर 1859 रोजी कॅप्टन नटल यांच्याबरोबरच्या युद्धात भागूजी यांचा मृत्यू झाला. त्यांचे वंशज स्वातंत्र्योत्तर काळापासून नांदूर शिंगोटे येथून उत्तरेकडे सुमारे चार किलोमीटरवर माळरानावरील स्मृतिस्थळाजवळच्या वस्तीवर राहत आहेत. 

शासकीय योजना, शिक्षणापासून दूर असलेले हे वंशज कोरडवाहू शेती व छोट्या दुकानावर चरितार्थ चालवित आहेत. या वस्तीवर ग्रामीण कारागिरांनी घडवलेला त्यांचा दगडी चिरा अनेक वर्षे "खंडोबा' म्हणून पूजला जात होता. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील अलका पवार अखिल भारतीय आदिवासी भटक्‍या विमुक्त जाती-जमाती संघटनेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतात. भागूजींचा पराक्रम इतिहासजमा होऊ नये, एवढीच इच्छा!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com