देश रक्षणार्थ जिल्ह्यातील 158 जवान शहीद 

देश रक्षणार्थ जिल्ह्यातील 158 जवान शहीद 

सांगली - स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीचा धगधगता इतिहास जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी घडवला. अनेकांच्या हौतात्म्यातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून भारत मातेचे रक्षण करण्यासाठीही आजही जिल्ह्यातील हजारो जवानांनी छातीची ढाल केली. आजही जिल्ह्यातील हजारो सैनिक सीमेवर रक्षणासाठी सज्ज आहेत. तर शेकडो सैनिक युद्धात कामी आले. त्यामुळेच तर "भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी..सैनिकहो तुमच्यासाठी..' असे गौरवोद्वगार बाहेर पडतात. 

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी लढताना जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारक हुतात्मा झाले. या क्रांतिकारकांचा वारसाच आज देशातील जिगरबाज जवान चालवत आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईत अग्रेसर राहिलेला सांगली जिल्हा स्वातंत्र्यानंतरही देशरक्षणात अग्रभागी राहिला. स्वातंत्र्यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल 158 जणांनी देशरक्षणासाठी प्राणाची बाजी पणाला लावून हौतात्म्य पत्करले. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतीलच सर्वाधिक सैनिक सीमेवर लढतात. तर आतापर्यंत याच जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिकांनी सीमेचे रक्षण केले. 

स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्‍मीर मोहीम, भारत-पाक युद्ध, भारत-चीन युद्ध, कारगिलमधील ऑपरेशन विजयसह विविध ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील 158 जवान शहीद झाले. वर्षापूर्वी जिल्ह्यातील सुपुत्र नितीन कोळी, रामचंद्र माने शहीद झाले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक जवान सेनादल, नौदल, वायुदल आणि इतर संरक्षण सेवेत दाखल आहेत. भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांनी तळहातावर प्राण घेतले आहेत. देशसेवेसाठी कौटुंबिक सुखाचा त्याग करून सदैव रक्षणासाठी तत्पर असलेल्या सैनिकांप्रती "भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी.. सैनिकहो तुमच्यासाठी' अशा गाण्याच्या ओळी नक्कीच आठवतात. 

व्यर्थ न हो बलिदान.. 
1949 पासून जिल्ह्यातील 158 जवान शहीद झाले. 1964-65 च्या भारत-पाक युद्धात जिल्ह्यातील 78 जवान शहीद झाले. तर कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये हवालदार सुरेश चव्हाण, शिपाई महादेव पाटील हे वीर जवान शहीद झाले. ऑपरेशन बॅटल ऍक्‍स, हिफाजत, पवन, मेघदूत, रक्षक, ऑरचिड, फॉल्कन, ऱ्हाईनो, पराक्रम, सुदान, जम्मू-काश्‍मीर मोहीम यामध्ये एकूण 70 जण शहीद झाले. 1961-62 च्या चीन युद्धातही जिल्ह्यातील 8 जवान शहीद झाले. 

वीर जवान तुझे सलाम- 
देशरक्षणार्थ 158 जवान शहीद झाले असले तरी विविध युद्धांत शौर्य गाजवणारे जवानही जिल्ह्यात कमी नाहीत. तब्बल 80 जणांनी शौर्याची गाथा लिहिली. वीरचक्र, महावीर चक्र, सेना मेडल, मेन्शन-इन- डिसपॅच, नौसेना मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशी शौर्यपदके पटकावण्याची परंपरा 1942 पासून आजतागायत सुरूच आहे. 

21 हजार माजी सैनिक- 
आजपर्यंत देशाचे रक्षण केलेल्या माजी सैनिकांची जिल्ह्यातील संख्या 15 हजार 800 इतकी आहे. तर माजी सैनिकांच्या विधवा पत्नींची संख्या 4200 इतकी आहे. तर सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक जवान सीमेवर तैनात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com