जत नगरपालिकेचा कारभार वर्षभरापासून मुख्याधिकारीविना

जत नगरपालिकेचा कारभार वर्षभरापासून मुख्याधिकारीविना

जत - नगरपालिकेच्या स्थापनेपासून मुख्याधिकाऱ्याचे लागले ग्रहण सुटता सुटेना अशी अवस्था झाली आहे. वर्षभरापासून पालिकेचा कारभार मुख्याधिकारीविना सुरू आहे. सीओ मिळावा यासाठी नव्या कारभाऱ्यांनीही गुडघे टेकले. पालिकेचा संपूर्ण कारभार काही नगरसेवकांनी हातात घेतला आहे. ते कर्मचाऱ्यांवर तोरा दाखवत आहे. यामुळे शहराचा विकासाचे मात्र तीन तेरा झाले आहेत. 

२०१२ मध्ये पालिकेची स्थापना झाली. पहिल्या निवडणुकीनंतर प्रशासकाचा कालावधी संपला. त्यानंतर प्रारंभच उसना मुख्याधिकारी घेऊन कारभार सुरू झाला. चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पंडित पाटील यांच्या रूपाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले. पण कारभाऱ्यांच्या कुरघोड्यात त्यांची कुचंबना झाली. भरीव असे एकही काम झाले नाही. त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी सौ. पाटील यांची नेमणूक झाली. प्रारंभी स्वच्छ प्रतिमा व कडक शिस्तीच्या मुख्याधिकारी म्हणून दबदबा निर्माण केला. परंतु त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. नोंदी, दाखले, एनओसी यातील घोळामुळे त्यांची प्रतिमा डागाळली. त्यांच्या काळात शौचालयाचा घोटाळा गाजला. प्रचंड तक्रारीमुळे त्यांची बदली झाली. 

तेव्हापासून आजपर्यंत पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे. सध्या पलूसच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तात्पुरता कार्यभार आहे. मात्र ते जतकडे क्‍वचितच फिरकतात. परिणामी पालिकेचा  कारभार मुख्याधिकारी विनाच चालेला आहे. तीन महिन्यांपूर्वी पालिकेत नवे कारभारी आले. प्रारंभी मुख्याधिकारी आणण्यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न  करीत होते. मात्र कुठे माशी शिंकली कळेना. काही नगरसेवकांची तोंडे वेगळ्या दिशेने गेले. धडपडणारे  नगरसेवक सध्या शांत आहेत. मुख्याधिकारी नसल्याने पालिकेचे कामकाज ठप्प आहे. मासिक सभा, विशेष सभाही एवढेच नव्हे तर अर्थसंकल्पीय सभाही मुख्याधिकारीविनाच घ्यावी लागली हे दुर्दैव. विकासाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी पेलणारेच नसल्याने  विकास कामे ठप्प झाली आहेत. वर्षभरापासून रुतलेला गाडा हाललाच नाही. 

विरोधकांची धारही बोथट 
मुख्याधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. कर्मचाऱ्यारी ठरावीक नगरसेवकांनी सांगिताल्यावरच काम करत असल्याचे चित्र आहे. काही नगरसेवक  सकाळी दहा ते पाच अशी कार्यालयीन कामकाजासारखे बसून असतात. दिवसभर कर्मचाऱ्यांवर तोरा मारत आपले काम साधून घेत आहेत. विरोधकांच्या आक्रमकतेची धारही कमी झाली आहे. अशामुळे शहराच्या मुख्य प्रश्‍न जैसे थे आहेत. विकासाचे तीन तेरा झाले आहेत. पालिकेकडून अपेक्षा ठेवून असलेल्या नागरिकांचे हालही होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com