Sangli : पावसाने डाळिंब उत्पादकांची अडचण

तेल्याबरोबरच पाकळी करपा, कुजव्याचा धुमाकूळ
डाळिंब
डाळिंबsakal

आटपाडी : आठ ते दहा दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. वाढलेले तापमान, संततधार पाऊस यामुळे मृगबहार धरलेल्या बागांत तेल्याबरोबरच पाकळी करपा, कुजव्याने धुमाकूळ घातला आहे.

चार वर्षांपासून वाढत चाललेल्या पावसामुळे दुष्काळी भागाला तारलेले डाळिंब पीक धोक्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतात पाणी साचणे व पाणी मुरल्यामुळे मर, पिन बोर रोगाने हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बागाच्या बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहेत.

आटपाडीच्या पश्चिम भागात बागांचे अल्प प्रमाण आहे, तर पूर्व भागात रोगामुळे डाळिंबाचे क्षेत्र घटत चालले आहे. मर व पिन बोर रोगाच्या तडाख्यातून वाचलेल्या डाळिंबाचा बहार काही शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात; तर उर्वरित शेतकऱ्यांनी १५ जुलैच्या दरम्यान धरला. जूनच्या बागेत सेटिंग झाले आहे, तर त्यानंतर धरलेल्या बागा कळी, फलधारणेच्या अवस्थेत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आटपाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. २४ तासांत किमान तीन ते चार वेळा दमदार पाऊस हजेरी लावू लागला आहे.

पाऊस जादा झाल्यामुळे शेतातून पाणी बाहेर पडून नाले, ओढे वाहू लागले. रोजच पाऊस होत असल्यामुळे बागेत पाणी साचून राहिल्याने मूळकुज सुरू झाली आहे. परिणामी झाडाचे कामच थांबले. त्यामुळे रोगाने डोके वर काढले आहे. जोडीला तापमानही वाढल्यामुळे तेल्याने धुमाकूळ घातला आहे. पाकळी करपा, फळकुज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बागा वाचवण्याची धडपड...

औषध फवारणी घेऊन बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे शेतकरीही हतबल झाले आहेत. १५ जुलैनंतर धरलेल्या डाळिंब भागामध्ये पूर्ण कळीची गळती झाली आहे. यंदाही दुष्काळी भागातून डाळिंबाच्या उत्पादनात प्रचंड मोठी घट होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com