सांगली : जिल्ह्यात 31 मार्च अखेर 93 लाख 42 हजार 161 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या हंगामात 49.2 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. म्हणजे यंदा त्यात जवळपास 44 लाख क्विंटलने उत्पादन वाढले आहे. ही विक्रमी वाढ आहे.
यंदाचा सरासरी 11.82 टक्के साखर उतारा आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील 18 पैकी माणगंगा (आटपाडी), महांकाली (कवठेमहांकाळ) आणि केन ऍग्रो (कडेगाव) वगळता पंधरा कारखान्यांनी हंगाम घेतला गतवर्षी बंद असलेले तासगाव व नागेवाडी तसेच जत असे तीन अधिक कारखाने सुरू होते. सध्या 31 मार्चनंतर अद्याप सोनहिरा आणि राजारामबापू असे दोनच कारखाने सध्या सुरू आहेत. आठवडाभरात या कारखान्यांचे गाळपही थांबेल असा अंदाज आहे. गतवर्षी कोरोनामुळे कारखान्यांना हंगाम आटोपता घ्यावा लागला होता.
राज्यातील चित्र
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात एकूण 189 साखर कारखाने सुरू झाले. त्यात 95 सहकारी, तर 94 खासगी आहेत. यंदाच्या हंगामात 103 साखर कारखान्यांना गाळप घेता आले नाही. ते बंद राहिले. त्यात सांगली, कोल्हापूर विभागातील 30 कारखान्यांचा समावेश आहे. 31 मार्चअखेर राज्यात 9 कोटी 59 लाख 64 हजार टन उसाचे गाळप झाले असून, 10 कोटी 2 लाख 73 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा राज्याचा सरासरी साखर उतारा 10.45 इतका आहे. कोल्हापूर विभागाचा उच्चांकी म्हणजे 11.96 टक्के साखर उतारा आहे. त्यानंतर पुणे विभागाच 10.86 टक्के आहे. अमरावतीचा निच्चांकी 8.93 टक्के उतारा आहे.
जिल्ह्यातील चित्र
गत हंगामात अठरापैकी जिल्ह्यातील सहा कारखाने बंद होते. यंदा मात्र तासगाव, जत, यशवंत असे तीन कारखाने सुरू राहिले. जत कारखान्याची मालकी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सहकारात आहे, तर यशवंत आणि तासगाव कारखान्याची मालकी खासदार संजय पाटील यांच्याकडे खासगीत आहे. अतिरिक्त तीन कारखाने सुरू झाल्याने यंदा गाळपात वाढ झाली आहे. ओघानेच साखर उत्पादनही वाढले आहे. गतवर्षीच्या हंगामात 41 लाख 19 हजार टन गाळप झाले होते व त्यातून 49 लाख 2 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते. हे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत 17 लाख 25 हजार क्विंटलने घटले होते.
यंदा मात्र त्यात भरीव वाढ झाली असून गाळप आणि उत्पादन पूर्वपदावर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळपात 29.87 लाख टनांने गाळप वाढले आहे. तर साखर उत्पादन 44.4 लाख क्विंटलने वाढले आहे. ही मोठी वाढ दिसण्याचे कारण असं की गतवर्षी म्हणजे 2019-20 या हंगामात ऊस गाळपात 15 लाख 56 हजार 964 टन आणि साखर उत्पादनात 17 लाख 25 हजार क्विंटल साखर उत्पादनात घट झाली होती. ही घट भरून काढत यंदा जिल्ह्यातील साखर गाळपात उत्पादनात यंदा भरीव वाढ झाली आहे. गाळपात 37.87 लाख टनांने वाढ झाली असून, ओघानेच साखर उत्पादनात 44.04 लाख क्विंटलने वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील ऊस हंगामाची स्थिती
कारखाना | ऊस गाळप | साखर (क्विंटल) | साखर उतारा |
दत्त इंडिया (वसंतदादा) | 877470 | 1032680 | 11.77 |
राजरामबापू (साखराळे) | 944515 | 112100 | 11.87 |
विश्वासराव नाईक | 580844 | 660910 | 11.38 |
हुतात्मा (वाळवा) | 542640 | 654175 | 12.06 |
राजारामबापू (सुरुल) | 523958 | 648100 | 12.37 |
तासगाव | 148575 | 159000 | 10.70 |
राजारामबापू (जत) | 155070 | 152770 | 9.85 |
सोनहिरा (वांगी) | 902170 | 1102320 | 12.22 |
क्रांतिअग्रणी (कुंडल) | 860960 | 1039640 | 12.08 |
राजाराबापू (सर्वोदय) | 383654 | 488000 | 12.72 |
मोहनराव शिंदे (आरग) | 289555 | 331827 | 11.46 |
निनाईदेवी (दालमिया) | 322960 | 4630750 | 12.42 |
यशवंत शुगर (नागेवाडी) | 119575 | 126170 | 10.55 |
उदगिरी (बामणी) | 562000 | 670890 | 11.94 |
सद्गुरू (राजोवाडी) | 642972 | 691604 | 10.76 |
एकूण | 7906916 | 9342161 | 11.82 |
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.