अखेर मिळणार तुम्हाला तुमची परी...

Vehicles
Vehicles

सातारा : लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कायद्याचा दंडूका उगारत पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी वाहने दंडात्मक कारवाई करून सोडण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. त्यामुळे गाडीविना असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु, गुन्हे दाखल झालेल्यांना न्यायालयाच्या परवानगीनेच दुचाकी घेता येणार आहेत. 

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्चपासून देशात व राज्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाला. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व उद्योग, व्यवसाय व दुकानांवर निर्बंध आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश जारी केले होते. नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यातही अत्यावश्‍यक वस्तू आणण्यासाठी जवळच्या दुकानात तेही पायी जाण्याचीच मुभा देण्यात आलेली होती. अत्यावश्‍यक सेवांमध्ये असलेल्या नागरिकांनाच दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरण्यास या कालावधीत मुभा देण्यात आली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले हे आदेश डावलूनही जिल्ह्यामध्ये अनेकजण रस्त्यावर येत होते. त्यांना रोखण्यासाठी सुरवातीला पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्यास सुरवात केली होती. त्याने जनक्षोभ वाढण्याची शक्‍यता होती. ही गोष्ट ओळखून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संपूर्ण पोलिस दलाला लाठीमार न करण्याचे निर्देश दिले. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामध्ये अनावश्‍यकपणे गाड्या बाहेर काढणाऱ्यांच्या गाड्याच लॉकडाउनच्या कालावधीपर्यंत जप्त करण्याचा फंडा पोलिसांनी काढला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी आपापल्या परिसरामध्ये गाड्या जप्तीची मोहीम सुरू केली. 

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी आत्तापर्यंत 205 चारचाकी गाड्या, तर तब्बल चार हजार 418 दुचाकी जप्त केल्या आहेत. सातारा शहर, शाहूपुरी, कऱ्हाड या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या. गाड्यांची जप्ती झाली. परंतु, लॉकडाउनचा कालावधी वाढत चालला आहे. सध्या तिसरा लॉकडाउन सुरू आहे. चौथा लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जप्त केलेल्या गाड्या मिळणार कधी, असा प्रश्‍न संबंधितांना पडला आहे. अशांना आता दिलासा मिळणार आहे. 

तिसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी दुचाकीवरून एक व चारचाकी वाहनातून दोघांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे या निर्णयापूर्वी जप्त केलेली वाहने सोडण्याबाबत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विचार सुरू केला आहे. 

जी वाहने केवळ जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दंड भरून घेऊन गाड्या सोडण्यात येणार आहेत. मात्र, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशांना न्यायालयाला विनंती करूनच वाहन सोडवून घ्यावे लागणार आहे. परंतु, ही संख्या फार कमी आहे. त्यामुळे बहुतांश जणांना वाहने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकाच दिवशी वाहन नेण्यासाठी गर्दी होऊ नये त्यामुळे याबाबतची प्रक्रिया पोलिस दलाकडून कळविली जाणार आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र वगळता वाहन वापरायला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे. या निर्णयापूर्वी जप्त केलेल्या गाड्या सोडण्याबाबत लवकरच प्रक्रिया जाहीर केली जाईल. परंतु, नियमानुसार दुचाकीवर एकच व चारचाकीत दोघांनाच प्रवासाची परवानगी आहे. त्याचे उल्लंघन केलेल्या गाड्या आत्ताच सोडल्या जाणार नाहीत. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही जप्तीची कारवाई सुरू राहील. 
-तेजस्वी सातपुते, 
पोलिस अधीक्षक, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com