Coronavirus : जिवाचा धोका पत्करुनही परिचारीका तीन महिने पगारविना

Coronavirus : जिवाचा धोका पत्करुनही परिचारीका तीन महिने पगारविना

सातारा : कोरोना संसर्गाच्या काळात जिवाचा धोका पत्करून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अस्थायी परिचारीकांना कोणत्याही प्रकारे शासकीय किंवा विमा कवच देण्याची तरतूद नाही. त्यामुळे या लढ्यात काही झाल्यास त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य रामभरोसेच आहे. शासनाने संरक्षीत करून त्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी निर्णय घेणे आवश्‍यक आहे. कोरोना संसर्गाशी संपूर्ण देशभरात आरोग्य कर्मचारी लढत आहेत. जिवाची बाजी लावून लढणाऱ्या या कोरोना फायटर्संना अनेक ठिकाणी संसर्गाची शिकारही व्हावे लागले आहे. कुटुंबापासून विलग राहावे लागत आहे ते वेगळेच. त्यांच्या या कामाची दखल घेत खुद्द पंतप्रधानांनी कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मेणबत्ती पेटविण्याचे तसेच थाळी नाद करण्याचे आवाहन संपूर्ण देशाला केले होते. त्याला संपूर्ण देशभरातून प्रतिसाद मिळाला. नुकतेच सैन्य दलानेही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हवाई पुष्पवृष्टी केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे. आणखी जिद्दीने व धैर्याने ते या कामात गुंतले आहेत. शाब्बासकीची थाप महत्वाची असतेच. परंतु, केवळ तेवढीच देऊन हातवर करणेही योग्य व पुरेसे नाही.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
कोरोना संसर्गाशी चाललेल्या या लढाईत सर्वाधीक धोका हा रुग्ण किंवा संशयीताच्या सर्वात जवळ व संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच आहे. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा शासनाने 50 लाख रुपयांचा विमा काढल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे किमान आपल्या परिवाराचे भविष्य तरी सुरक्षीत राहिल हा एक आधार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाला. परंतु, हा आधार शासनाने केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादीत ठेवला आहे.
 
परिचारीका या रुग्णालयासतील प्रत्यक्ष व जास्त काळ रुग्णाच्या संपर्कात राहणारा घटक आहे. त्यामुळे त्या हायरिस्कमध्ये येतात. तरीही अस्थायी व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या परिचारीकांना विमा कवच किंवा अन्य सवलती मिळत नाहीत. स्थायी कर्मचाऱ्यांच्याबरोबरीने अनेक ठिकाणी अस्थायी अशा परिचारीका कार्यरत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये 30 ते 40 अशा परिचारीका कार्यरत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात सुमारे दहा ते बारा तर, प्रत्येक ग्रामिण रुग्णालयामध्ये तीन ते चार अशा अस्थायी, कंत्राटी किंवा बॉंण्डवर काम करत असलेल्या परिचारीका कार्यरत आहेत. त्यातील काहीजण कोरोना ड्युटीवरही आहेत. त्यामुळे त्यांना अधिक धोका पत्करून काम करावे लागत आहे. कोरोनाच्या परिस्थीतीत काम करणाऱ्या या परिचारीकांनाही विमा कवच त्याच बरोबर त्यांना व त्यांच्या कुटुंबाना आश्‍वस्त करतील अशा स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती शासनाने देणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यामध्ये मयत झालेली एक परिचारीका ही अस्थायी स्वरूपातच कामावर होती. त्यांच्या कुटुंबीयांनाही कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळताना दिसत नाही. त्यामुळे सर्वांनी स्वागत करावे, असे आवाहन खुद्द पंतप्रधान करत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेची हमी ही शासनाने घेणे गरजेचे आहे. 

तीन महिने पगारही नाहीत 

कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय कायम स्वरूपात कामावर नसलेल्या परिचारीका कोरोनाच्या वातावरणात काम करत आहेत. शासनाने अद्याप त्यांच्या सुरक्षीततेची जबाबदारी घेतलेली नाही. असे असताना अनेकांचे पगारही दोन ते तीन महिन्यांपासून झालेले नाहीत. त्यामुळे शासन व प्रशासन नेमके करतेय काय, आपली प्रमुख जबाबदारी ते उचलणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

आक्रित घडलं...ती दोन वर्षांनी सापडली

अंत्यसंस्कारासाठी स्माशनभूमीत जाण्यापुर्वी हे वाचा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com