धनगांवच्या विमलाईची बियाणांची बॅंक, भाज्या, धान्यांचे जपले वाण

seed bank
seed bank
Updated on

भिलवडी-सांगली : धनगांव (ता. पलुस) येथील वृद्धेने भाज्या, कडधान्यांचे देशी वाण जपले आहेत. विमलाबाईंची ही बियाणे बॅंक 50 वर्षापासून सुरू आहे. खरीपाच्या तोंडावर त्यांच्या घरी वर्दळ वाढली आहे. 


उन्हाळा संपला की वरतीकडचं गार वारं सुटलं, की गार हवा सुरू होते. मग विमलाई अर्थात विमल महादेव उतळे यांच्या बियाणांच्या बॅंके ची उलाढाल सुरू होते. त्यांच्या भाषेत हे बी भराण. भाजी, कडधान्ये, डाळी, अन्य धान्ये सगळं घरचंच पाहिजे. कोणत्या ऋृतूत कोणत्या भाज्या विना औषध आणायच्या याची चांगली माहिती त्यांना आहे. चांगल पेरलं, की चांगलंच उगवते, जुनं तेच सोनं अशी त्यांची धारणा आहे. 
भाज्या, कडधान्ये यांचे अस्सल देशी वाण साठवून ठेवायचे आणि वर्षभर वेगवेगळ्या हंगामात ते टोकायचे. आले, की ते इतरांनाही द्यायचे असा त्यांचा शिरस्ता 50 वर्षे सुरू आहे. 


अनेक देशी वाण त्यांनी जपले आहेत. भाज्यांत मेथी, पालक, करडा, धना, आंबाडा, राजगीरा, चाकवत, आंबट चुका, लाल तांदळ, शेपू, वांगे, दोडका, कारले आहेत. हिरवा पिवळा मुग, उडीद, हुलगा, काळा श्रावण घेवडा, तीळ, पठारी पावटा, चुनुला पावटा, बुटका घेवडा, जवस, चवाळी अशी कडधान्ये त्यांच्या बियाणे बॅंकेत आहे. 


रासायनिक बीजप्रक्रियेविना घरगुती पध्दतीने साठवण केली जाते. काही राखेत, कागदाच्या पुड्यांत तर काही कोरड्या हवेत टरफलासह टांगून ठेवले जाते. टोकणीचा हंगाम आला, की बॅंक सुरू होते. पिकवून खाणाऱ्यांना विनामोबदला वाटप केले जाते. अट एकच दिलेले बियाणे मोडायचे नाहीत. 
हे बियाणे शेतकऱ्यांसह असंख्य महिलांच्या हातून मातीत पडले. विमलाईने लॉकडाऊन काळात अनेकांना शेतातील भाजीपाला दिला. 


शेती उत्पन्न वाढीसाठी हरितक्रांती झाली. नवे संशोधित संकरीत, सुधारीत बी बियाणे आले. नवे वाण आले. आणि कीड, किटक, नवे रोग व किटकनाशके आली. जिवाणू, विषाणू आले. पाऊस लहरी झाला. हवामान बाधक बनले. बहुतांश सर्व पिकावर किडनाशकाची फवारणी सुरू झाली. फळे, फुले, भाज्यांचा आकर्षक रंग, तजेला, आकारवाढीसाठी रासायनिक खते, उत्प्रेरके, जैविक खतांची फवारणी सुरू झाली आहे. फळांचा रंग व ती तत्काळ पिकवण्यासाठी रसायनांचा वापर सुरू झाला आहे. 
खाणाऱ्याच्या शरीरावरही घातक परिणाम होत आहे. पिकांवर आणि माणसांवरही असंख्य रोग, व्याधी आल्या. व्यंग वाढले, रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. उशिरा का होईना शहाणपण येतंय. देशी वाणांची मागणी आणि रसायन, औषधमुक्त धान्य, फळे, भाज्यांचा आग्रह वाढत आहे. 

महापूरात बियाणे वाचले 

सन 2019 मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुराचे पाणी गावात विमलाईच्या घरात घुसले. जीवापाड जपलेले बियाणे दुसऱ्या मजल्यावर ठेवले होते. त्यामुळे ते वाचले याचे त्यांना समाधान आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli land acquisition objections by farmers
Tukaram Mundhe’s Crackdown on Food Quality Violations
Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Marathi News Esakal
www.esakal.com