

The meeting focused on rural infrastructure, water supply, healthcare, education, sanitation and effective implementation of government schemes.
Sakal
अक्कलकोट : ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि गावपातळीवरील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एक अभिनव व आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी, पंचायत समितीच्या सभापती रश्मी हिप्परगी आणि उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून चपळगाव गटातील १८ गावांसाठी हन्नूर येथे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त ‘सहविचार सभा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.गावांचा सर्वांगीण विकास, स्थानिक गरजांचा प्रत्यक्ष आढावा आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, प्रशासक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील उद्दिष्टे, ग्रामीण विकासाची दिशा आणि प्रशासन-लोकप्रतिनिधी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.