मोठी ब्रेकिंग ! दहावीच्या भूगोल विषयाबाबत ठरला निर्णय 

SSC_Exam_0.jpg
SSC_Exam_0.jpg

सोलापूर : दहावीच्या विषयांचे पेपर होउन आता 20 दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली असून सोमवारी (ता. 13) बोर्डाचे अधिकारी त्यांची भेट घेणार आहेत. भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला असून मंगळवारी (ता. 14) त्यावर अंतिम निर्णय होईल, असे बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 


राज्यातील 18 लाखांहून अधिक विद्यार्थी 2019-20 मध्ये दहावीची परीक्षा देत असून पाच विषयांचे पेपर लॉकडाउनपूर्वी संपलेले आहेत. आता भुगोल या विषयाचा पेपर घ्यायचा म्हटले तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण वर्गखोल्यात सॅनिटायझर तथा जंतूनाशकाची फवारणी करावी लागणार आहे. तर सर्व विद्यार्थी अन्‌ पर्यवेक्षकांना एन- 95 मास्क द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या भितीने बहूतांश पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला पेपरला न पाठविण्याचाही निश्‍चय केला आहे. तसेच लॉकडाउनमुळे घरातील वातावरण अभ्यासासाठी पोषक राहिले नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. तर लॉकडाउननंतरही कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या वाढू लागल्याने भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत बहूतांश जिल्ह्यांमध्ये संचारबंदी व लॉकडाउन कडक करण्यात आला असून आता लॉकडाउनचा कालावधी वाढविण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे अशा भितीच्या वातारणात पेपर घेऊनच नये, अशी मागणी पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली असून आता पेपर रद्द होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे. 


पुणे बोर्डापुढे निकालाचा पेच 
राज्यातील 18 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे पेपर दिले आहेत. आता भुगोलाचा पेपर राहिला असून विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर या पेपरच्या गुणाचा परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पाच विषयांच्या उत्तरपत्रिका पडताळणी अन्‌ फेरपडताळणीचे काम लॉकडाउन अन्‌ संचारबंदीमुळे संथगतीने सुरु असल्याने निकालही लांबणीवर पडेल, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे. 


सरासरी गुण की पाच विषयांचाच निकाल : यावर निर्णय होईल 
दहावीच्या पाच विषयांचे पेपर होऊन खूप कालावधी झाला असून विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता राहिलेली नाही. विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात कोरोनाची भिती असून भुगोल विषयाचा पेपर घ्यायचे म्हटल्यास बैठक क्रमांक टाकणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी एन-95 मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. लॉकडाउनही वाढण्याची शक्‍यता असल्याने आता विद्यार्थ्यांना पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे की पाच विषयांचाच निकाल जाहीर करायचा, यावर शिक्षणमंत्री निर्णय घेतील, असे पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षण परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com