सोलापूर : कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे खबरदारी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण द्यावेत, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले. मात्र विद्यार्थ्यांनी इंटरनल ॲसेसमेंट दिलीच नाही, तर काही विद्यार्थ्यांनी खूपच कमी उपस्थिती लावली आहे अथवा अंतर्गत चाचण्यांमध्ये महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांना खूपच कमी गुण दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुढील सत्रात कसा प्रवेश द्यायचा, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे अशक्य असल्याने या विद्यार्थ्यांना इंटरनल ॲसेसमेंटवरून गुण द्यायचे का, असाही प्रश्न विद्यापीठांनी विचारला आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांमाधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील सुमारे 50 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पेच निर्माण झाला होता. त्यामध्ये सर्वाधिक सुमारे 40 लाख विद्यार्थी प्रथम व द्वितीय वर्षातील होते. या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाल्याने विद्यापीठासह महाविद्यालयांचा भार हलका झाल्याची चर्चा होती. मात्र, आता या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील सत्रात प्रवेश देताना विद्यापीठासह महाविद्यालयांची दमछाक होऊ लागली आहे. लेखी परीक्षा आणखी काही दिवस लांब असतानाच प्रात्यक्षिक परीक्षा कशी घ्यायची तर प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षा घेणे अशक्य; इंटरनल ॲसेसमेंटवरुन गुण देण्याचा पर्याय
प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा झाल्यानंतर आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, अंतिम सत्रापूर्वी घेण्यात येणारी त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सोशल डिस्टन्सच्या नियमामुळे व प्रयोगशाळांच्या कमतरतेमुळे घेणे अशक्य आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना इंटरनल ॲसेसमेंटवरून प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण देण्याचा पर्याय समोर आला आहे. तर प्रथम व द्वितीय वर्षातील एखादा विद्यार्थी इंटरनल ॲसेसमेंटसाठी उपस्थितच राहिला नाही अथवा महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांना इंटरनल ॲसेसमेंटमध्ये खूपच कमी मार्क दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे निकाल कसे लावायचे आणि त्यांना पुढील सत्रात कसा प्रवेश द्यायचा, असे प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली जाणार आहे.
- श्रेणीक शाह, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठ
इंटरनल ॲसेसमेंटमध्ये करावी लागणार खाडाखोड
कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरुन 50 टक्के तर इंटरनल ॲसेसमेंटवरुन 50 टक्के गुण दिले जाणार आहेत. मात्र, महाविद्यालयात येऊनही क्लासला अनुपस्थित राहणे, उद्धट वर्तन, वर्गात गैरहजर असणे, अभ्यासात मागे, अशा विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांनी इंटरनल असेसमेंटमध्ये खूपच कमी मार्क दिले आहेत. त्यामुळे आता अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे महाविद्यालयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांना आता इंटरनल असेसमेंट काढून त्यावर खाडाखोड करावी लागणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.