पावसाच्या शक्‍यतेने हादरला बळिराजा ! ज्वारी, गहू, हरभरा, कांद्यासह आंबा, द्राक्ष, कलिंगडाची काळजी

Worried_Farmer
Worried_Farmer

केत्तूर (सोलापूर) : नुकताच हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने अगोदरच सततच्या हवामान बदलामुळे "घायाळ' झालेला बळिराजा आता मात्र पुरता हादरला असून, अंदाजाप्रमाणे खरोखरच पाऊस झाल्यास तो संकटात येणार आहे. 

गतवर्षीपासून हवामान बदलाने कहरच केला आहे. थंडीच्या महिन्यात थंडी गायब झाली तर, थंडी संपण्याच्या वेळेला म्हणजेच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. ही थंडीही गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा गायब झाली आहे. रात्री व पहाटे गारवा कायम असतानाच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने सकाळी 11 नंतर मात्र उन्हाचे चटकेही जाणवू लागले आहेत. अशा विविधढंगी वातावरणामुळे शेतातील उभ्या पिकांवर मात्र विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे उभ्या पिकांवर औषध फवारणी करावी लागत असल्याने औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च नाइलाजाने करावा लागत आहे. 

गतवर्षी उन्हाळ्यानंतर पावसानेही वेळी-अवेळी बरसात केली, त्यामुळे दिवाळीही पावसातच गेली. अवकाळी पाऊस अधून- मधून धक्के देत होता आणि आता उन्हाळ्याच्या प्रारंभीच हवामान खात्याने पुन्हा पावसाचे संकेत दिले असल्यामुळे बळिराजा मात्र हादरून गेला आहे. 

सध्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी चालू आहे तर गहू, हरभरा, कांदा ही पिके काढणीच्या बेतात आले आहेत. त्यामुळे आता पाऊस झाला तर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. तर पावसाच्या शक्‍यतेने आंबा, द्राक्ष, कलिंगड व इतर पिकांनाही मोठा फटका बसणार आहे. गतवर्षी पाऊस जास्त काळ रेंगाळल्यामुळे ऊस गाळप हंगाम उशिराने सुरू झाला होता. त्या ऊसतोडीला देखील ब्रेक बसण्याची शक्‍यता आहे. 

एकूणच वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांची वाट अधिकच बिकट होत आहे, हेच खरे ! 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com