सोलापूर : राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेत कामावर हजर राहण्यासाठी आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना सरकारने दिले आहेत. त्यानुसार सोलापूर आरटीओ कार्यालयाने चेक पोस्टवर 1 मार्चपासून बायोमेट्रिक यंत्रणा बसविली असून आता कार्यालयात यंत्रणा बसविण्यासाठी निधीची मागणी केली आहे.
हेही नक्की वाचा : शिक्षक आमदारांबाबत शिक्षकींमध्ये नाराजी
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू केला. पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. सकाळी 9.45 वाजता कार्यालयात येणे बंधनकारक असून सायंकाळी 6.15 वाजता सुटी होणार आहे. एरव्ही सोयीनुसार कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक यंत्रणेमुळे वेळेत हजर राहावे लागत आहे. सोमवारी (ता. 2) आठवड्याच्या सुरवातीला उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, बहुतांश कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणाच नसल्याने तेथील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार कार्यालयात आल्याचेही चित्र पाहायला मिळाले.
हेही नक्की वाचा : काय म्हणता...! सोलापुरात 'मेट्रो'चे प्लानिंग
मार्चएंडची अशीही झलक
सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या 35 दुचाकीस्वारांवर हेल्मेट नसल्याने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 17 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर नवी शक्कल लढविली. कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांवरच निशाणा साधत हेल्मेट नसल्याप्रकरणी कारवाई करून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला. एरव्ही विनाहेल्मेट दुचाकीवरून आल्यानंतरही कारवाई झाली नसल्याने काही दुचाकीस्वार सोमवारी (ता. 2) विनाहेल्मेट दुचाकीवरून आले. त्यांना लक्ष्य करीत आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
हेही नक्की वाचा : सरपंच निवड जनतेतूनच ! 1570 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान
विद्यापीठांना लागू नाही पाच दिवसांचा आठवडा
राज्यात आता सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांच्या आठवड्याला सुरवात झाली. त्यानुसार सोमवारी (ता. 2) सर्वच विभागप्रमुखांनी कार्यालयात उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. मात्र, राज्यातील अकृषिक विद्यापीठांमध्ये हा निर्णय अद्यापही लागू झालेला नाही. विद्यापीठांमधील अधिकारी व कर्मचारी सरकारच्या स्पष्ट आदेशाची वाट पाहत आहेत. सरकारच्या स्पष्ट निर्देशानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. विकास कदम यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.