
Madha News
Sakal
माढा : माढा तालुक्यातील सिना नदीकाठच्या गावात आलेला पूर हळूहळू ओसरत असला तरी घरातील चिखलाचा राडारोड, भुईसपाट झालेली पिके, उघड्या पडलेल्या पाईपलाईन, वाहून गेलेली माती, खचलेले बांध, चिखलाने भरलेले गाईगुराचे गोठे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या असून अगोदरच खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीच्या हंगामाच्या तोंडावर पुराने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटास सामोरे जात आहे. अर्थात पूरस्थिती आणखी पूर्णपणे ओसरली नसून शेतकऱ्यांच्या शेतात अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे. उद्ध्वस्त झालेली शेती आणि मोडून पडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी शेतकरी कंबर कसू लागला असून शासनाने त्याच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे.