शाळा बंदचा मुख्याध्यापकांना अधिकार ! वस्तीगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांना मिळणार बसमधून सलवतीचा प्रवास

1School_Starts.jpg
1School_Starts.jpg

सोलापूर : राज्यातील पुणे, जळगाव, अकोला, अमरावती, ठाणे, मुंबई, नाशिक यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जोर पुन्हा वाढत आहे. राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांतर्गत साडेपाच हजार महाविद्यालये असून आता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठीच महाविद्यालयांमध्ये बोलावावे, तासिकेसाठी एकाचवेळी सर्वांना बोलावू नये, असे आदेश विद्यापीठांनी महाविद्यालयांना दिले आहेत. वसतिगृहे बंद असल्याने दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सवलतीचा प्रवास द्यावा, असे पत्रही विद्यापीठ व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहे.

मुख्याध्यापक घेणार शाळा बंदचा निर्णय
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर अकोला, अमरावतीसह काही जिल्ह्यांमध्ये दिवस-रात्र तर पुणे जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव वाढतोय, अशा ठिकाणच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आला आहे. परंतु, त्यासाठी गावातील ग्रामसेवक व मुख्याध्यापकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविणे आवश्‍यक आहे, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी सांगितले.

फेब्रुवारीच्या सुरवातीला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन-अडीच हजारांपर्यंत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दर दुप्पट झाला असून काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य सरकारने सावध पवित्रा घेत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांनी स्थानिक परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम अजूनही सुरुच आहेत. बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण नसल्याचे चित्र असून पोलिस कारवाईनंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर जुन्याच नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे नवे आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांनी काढले आहेत. त्यातून नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना बोलावू नये
कोरोनाची परिस्थिती अजूनही सुधारलेली नसून आता काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर एकही वसतिगृह सुरु करण्यात आले नसून शासनाकडून त्याला परवानगीही मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकसाठीच बोलावले जात असून एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना बोलावू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 
- डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com