कोरोनामुक्त झालेल्यांनी शंभर दिवस घ्यावी खबरदारी !

कोरोनामुक्त झालेल्यांनी शंभर दिवस खबरदारी घेतल्यास म्युकरमायकोसिस होणार नाही
Mucormycosis
MucormycosisEsakal
Summary

कोरोनातून बरे झाल्यानंतर बिनधास्तपणे वावरणाऱ्यांना म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. शहर- जिल्ह्यात 180 रुग्ण आढळले असून त्यातील 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले; मात्र दहा जणांचा मृत्यू झाला.

सोलापूर : कोरोनातून (Covid-19) बरे झाल्यानंतर बिनधास्तपणे वावरणाऱ्यांना म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) धोका वाढला आहे. शहर- जिल्ह्यात 180 रुग्ण आढळले असून त्यातील 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दहा जणांचा बळी या नव्या आजाराने घेतला आहे. सध्या 120 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांनी तीन महिन्यांपर्यंत (शंभर दिवस) आरोग्याची काळजी घ्यायला हवी; जेणेकरून हा आजार होणार नाही, असा विश्‍वास वैद्यकीय तज्ज्ञांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये व्यक्‍त केला. (Mucormycosis will not occur if those who have been corona-free take precautions for a hundred days)

Mucormycosis
"एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

ऑक्‍सिजन (Oxygen) व आयसीयूतील कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिसपासून दूर ठेवण्यासाठी उपचार साहित्यांची नियमित स्वच्छता करणे, वेळोवेळी त्याचे निर्जंतुकीकरण करणे, जुनाट साहित्य न वापरणे, याची खबरदारी रुग्णालयांनी घेणे गरजेचे आहे. उपचारापूर्वी रुग्णाची प्रकृती कशी होती, उपचाराचा कालावधी, त्यातील साहित्यांचा वापर, त्याचे स्वरूप यावर आता आरोग्य विभागाने लक्ष ठेवायला सुरवात केली आहे. कोरोनाच्या काही अत्यवस्थ रुग्णांवर 15 दिवसांपासून महिना- दीड महिन्यापर्यंत उपचार केले जातात. त्यात ऑक्‍सिजन, आयसीयूतील रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यात धूळ, सूक्ष्मजीव आणि बुरशी वाढण्याची शक्‍यता असते. तसेच रुग्णालयांच्या वातावरणात सामान्यत: रोगकारक जीवाणू, विषाणू आढळतात. अशावेळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्याकडेही लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर रुग्णांनी साधा, पौष्टिक आहार घ्यावा. हलका व्यायाम करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Mucormycosis
जिल्ह्यातील सव्वालाख रुग्णांची कोरोनावर मात! आज 1436 रुग्णांची वाढ

रुग्णालयांमधील बुरशी संसर्गाची ठिकाणे...

  • ऑक्‍सिजन पाइप आणि मास्क

  • ऑक्‍सिजन थेरपीत वापरले जाणारे पाणी

  • वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य

  • जेवण, पिण्याचे पाणी

  • अंथरुण, पांघरुणासह नियमित वापरातील साहित्य

बुरशी संसर्ग रोखण्यासाठी...

  • ऑक्‍सिजन मास्क, पाइप वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे

  • वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे नियमित निर्जंतुकीकरण करणे

  • ऑक्‍सिजन थेरपीत वापरले जाणारे पाणी स्टराईल असणे गरजेचे आहे

  • रोज साफसफाईबरोबरच रुग्णालयाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्याला प्राधान्य द्यावे

  • बुरशी वाढीला प्रतिबंध घालण्यासाठी हवा खेळती राहावी

बुरशी संसर्गाचा धोका का?

कोरोना उपचारादरम्यान वापरले जाणारे स्टेरॉईड आणि ऍन्टिबायोटिक्‍समुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्‍ती कमी झालेली असते. अशावेळी स्वच्छता न ठेवल्यास नाक, तोंडाद्वारे बुरशीचा संसर्ग होण्याची शक्‍यता असते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्‍तीच कमी झाल्याने आणि उपचारादरम्यान रक्‍तातील साखर वाढल्याने बुरशी वाढीला पोषक वातावरण मिळते. पर्यायाने हा संसर्ग गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे रुग्णांसह रुग्णालयांनीही खबरदारी घ्यायला हवी.

आजाराची लक्षणे...

  • दाढदुखी होऊन तिथून हा आजार पसरण्याची शक्‍यता

  • नाकाला सूज येते आणि नाकातून या आजाराची होते सुरवात

  • डोळे लाल होतात आणि डोळ्याला सूज येते, तोंडात काळा चट्टा येतो

  • रक्‍तातील साखर वाढून रोगप्रतिकारकशक्‍ती होते कमी

म्युकरमायकोसिस हा आजार बुरशीजन्य असून तो संसर्गजन्य नाही. कोव्हिड रुग्णांमध्येच त्याचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांनी पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत खबरदारी घ्यायला हवी. रक्‍त, शुगर तपासणी करून घ्यावी आणि मौखिक आरोग्य राखावे. ग्रामीणमधील रुग्ण शहरात उपचार घेत आहेत.

- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

रोगप्रतिकारकशक्‍ती कमी असलेल्यांना (डायबेटिस, शुगर वाढलेली आहे, शुगर नियंत्रणात नाही, ट्रान्स्प्लान्ट झालेले रुग्ण) हा आजार होतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नाकातून रक्‍त, चेहरा सुजलेला, दाढ दुखतोय तर डॉक्‍टरांकडे जायला हवे.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

कोरोना, म्युकरमायकोसिस झाल्यानंतर उपचारासाठी धावपळ करण्यापेक्षा ते आजार होऊच नयेत म्हणून खबरदारी घ्यावी. कोरोना झाल्यानंतर 100 दिवस रुग्णांनी खबरदारी घ्यावी. रुग्णांनी रक्‍त, शुगरची टेस्ट करावी. एन-95 मास्क एकदा वापरल्यावर टाकून द्यावा, अन्य मास्क नियमित स्वच्छ धुवावेत. शुगर असलेल्यांची रोगप्रतिकारकशक्‍ती कमी झाल्यानेच हा आजार बळावतो.

- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com