गावाकडे कधीही न फिरकणारे मारू लागले गावविकासाच्या गप्पा ! ग्रामपंचायत निवडणूक मोर्चेबांधणीला वेग 

political
political
Updated on

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. गावाकडे कधीच न फिरकणारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावविकासाच्या गप्पा मारू लागल्याने सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी होऊ लागली आहे. यातच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गाव कारभाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

तालुक्‍यामध्ये 61 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. ही निवडणूक याअगोदरच्या निवडणुकीपेक्षा राजकीयदृष्ट्या वेगळी असणार आहे. या अगोदरच्या झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक गावांमधून शेकाप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती होऊन निवडणूक लढवली जात होती. परंतु या वेळच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमधील पक्षविरहित आघाड्यांमुळे सध्या निवडणुकीतील स्थानिक आघाड्या कशा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना पाठिंबा देऊन विधानसभा निवडणुकीचे वातावरण बदलले होते. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षामध्ये अस्वस्थता आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यावेळच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील आघाड्या कशा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी नेतेमंडळींनी "थांबा व पाहा'चे धोरण अवलंबले असले, तरी गाव पातळीवरील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरहित झालेली आघाडी या ग्रामपंचायत निवडणुकीत कितपत परिणाम करते? पक्षीय युत्या की स्थानिक पातळीवर ग्रामस्तरीय आघाड्या होणार? याकडे लक्ष लागले आहे. 

सरपंच आरक्षण सोडतीमुळे अस्वस्थता 
सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गाव पुढाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरपंच होण्यासाठी इच्छुक असलेल्या गाव पुढाऱ्यांनी वॉर्डातील आरक्षण सोडतीनंतरच तयारी सुरू केली होती. सरपंचपदाचे आरक्षण निघाले की जोमाने तयारी सुरू ठेवायचे, असे चित्र प्रत्येक गावात दिसत होते. परंतु सध्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या भावी सरपंचांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

पक्षीय की स्थानिक आघाड्या? 
सध्याच्या वातावरणामध्ये शेकाप, भाजप पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. तसेच आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचे गट एकत्रितपणे निवडणूक लढवतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक पातळीवरील आघाडी व युत्या यांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पक्षीय युत्या की स्थानिक आघाड्या? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

सोशल मीडियावर टीकाटिप्पणींना उधाण 
या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर गप्पांना (टीका-टिप्पणीला) उधाण आले आहे. गावात कधीही न फिरकणारे सध्या गाव विकासाच्या गप्पा मारताना दिसू लागल्याने अनेक तरुण सोशल मीडियावर यावर टीकाटिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्यक्ष जाऊन प्रचार करण्यापेक्षा सोशल मीडियाचा मोठा वापर होणार असल्याचे चित्र सुरवातीलाच दिसून येत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com