सोलापूर : कोरोनामुळे शाळा सध्या बंद आहेत, परंतु शिक्षकांना सोमवार ते शनिवारपर्यंत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. रविवारी शिक्षकांनी घरबसल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन टीचिंग करावे, त्यांना स्वाध्याय या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आदेश शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी काढले आहेत.
शाळा बंद असतानाही संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना योगदान द्यावे लागणार आहे. सध्या राज्य शालेय शिक्षण विभागाच्या "स्वाध्याय' या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार 349 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. बुलढाणा जिल्ह्यानंतर सोलापूरचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांमध्ये बुलढाणा, सोलापूर, जळगाव, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे अनुक्रमे अव्वल असून पटसंख्येच्या तुलनेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये बुलढाणा अव्वल असून त्यापाठोपाठ सातारा, वाशिम, उस्मानाबाद व हिंगोली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
पहिली ते पाचवीसाठी सात प्रश्न तर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा प्रश्न दिले जातात. मराठी माध्यमातून मराठी, गणित, विज्ञान व सेमी इंग्रजी तर उर्दू माध्यमातून गणित व विज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्याद्वारे जाणून घेतली जात आहे. कोरोना काळात या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना, त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून शिक्षकांना सुट्टीतही काम करावे लागणार आहे. https://wa.me/918595524519?text=Namaskar या लिंकवरून विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे.
पहिली ते आठवीपर्यंत "असे' होईल मूल्यमापन
पहिली ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना 30 गुणांची लेखी चाचणी तर 70 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन होते. तिसरी व चौथीच्या वर्गासाठी 40 गुणांचे लेखी तर 60 गुणांचे तोंडी परीक्षा असते. पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन 50 गुण चाचणीचे आणि 50 गुण तोंडी असे होते. सातवी आणि आठवीसाठी 70 गुणांची लेखी चाचणी तर 30 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या असून आता थेट पुढील शैक्षणिक वर्षातच शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेणे सध्या अशक्यच आहे. त्यामुळे स्वाध्याय उपक्रम, ऑनलाइन टीचिंगद्वारे वाचन आणि तोंडी चाचणी, याच्या माध्यमातून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
शिक्षणाधिकारी म्हणाले...
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.