शैक्षणिक कर्जवाटपात बॅंका नापास ! उद्दिष्ट एक लाख विद्यार्थ्यांचे अन्‌ कर्जवाटप 25 हजार विद्यार्थ्यांनाच 

Education
Education

सोलापूर : आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या हेतूने दरवर्षी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीतर्फे बॅंकांना शैक्षणिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश क्षेत्रातील नोकऱ्यांत कपात झाली आहे. तर घरबसल्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतला असून, 2020-21 मध्ये सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांना एक हजार 982 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट असतानाही बॅंकांनी केवळ 25 हजार विद्यार्थ्यांनाच 507 कोटींचे शैक्षणिक कर्ज दिले आहे. 

उच्च शिक्षण घेताना कौटुंबिक परिस्थितीमुळे हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत व काही सहकारी बॅंकांकडून कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीतर्फे राज्यातील सर्वच बॅंकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील बॅंकांना तीन हजार 82 विद्यार्थ्यांना 122 कोटी 29 लाखांचे शैक्षणिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी अवघ्या 780 विद्यार्थ्यांनाच कर्जवाटप केले आहे. शैक्षणिक कर्जवाटपाच्या उद्दिष्टानुसार अद्याप बॅंकांनी 40 टक्‍केदेखील कर्जवाटप केले नसल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरीही नगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे येथील बॅंकांनी एक हजार ते तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले आहे. दुसरीकडे नंदुरबार, गडचिरोली, हिंगोली येथील बॅंकांनी शैक्षणिक कर्जवाटपाचे 20 टक्‍केही उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. 

सोलापूर जिल्ह्यातील 780 विद्यार्थ्यांना कर्जवाटप 
शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना नोकरी लागल्याच्या एक वर्षापर्यंत दिले जाते. त्यानंतर कर्जाची परतफेड करणे विद्यार्थ्याला बंधनकारक आहे. कर्ज न भरल्यास त्यांच्या पालकांकडून कर्जाची वसुली केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील 780 विद्यार्थ्यांना एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या काळात पावणेआठ लाखांचे कर्जवाटप केले आहे. 
- प्रशांत नाशिककर,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर 

शैक्षणिक कर्जवाटपाची स्थिती 

  • शैक्षणिक कर्ज मिळालेले विद्यार्थी : 24,994 
  • विद्यार्थ्यांना कर्जवाटप : 507.85 कोटी 

पालकांना वसुलीची नोटीस 
शिक्षणाची चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध घेतला, मात्र नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, बॅंकांच्या निकषानुसार पाच वर्षे पूर्ण होऊनही कर्जाचे हप्ते न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता बॅंकांनी कर्जवसुलीची नोटीस बजावली आहे. थकबाकीत गेलेल्या खात्यात कर्जाचा भरणा मुदतीत न केल्यास तारण मालमत्तेवर बोजा चढविण्याचाही इशारा काही बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com