उजनीच्या पाण्यावरून अजूनही पालकमंत्र्यांना धास्ती !
उजनीच्या पाण्यासंदर्भात निर्णय रद्द होऊनही पालकमंत्र्यांच्या बैठकीवेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जात आहे. अजूनही पालकमंत्र्यांना निषेधाची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.
सोलापूर : उजनी धरणातून (Ujani Dam) पाच टीएमसी पाणी इंदापूर (Indapur) तालुक्यातील 22 गावांना नेण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांच्या माध्यमातून राज्य सरकारने घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी त्या निर्णयाला विरोध केला. अखेर तो निर्णय मागे घेण्यात आला. तरीही त्याची धग अजूनही संपलेली दिसत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी आरसीपी (RCP), वाहतूक व शहर पोलिसांचा (Solapur City Police) तगडा बंदोबस्त ठेवला जात आहे. (The Guardian Minister's meeting in Solapur is heavily guarded by the police)
कोरोनाची (Covid-19) परिस्थिती आटोक्यात यावी या हेतूने पालकमंत्र्यांनी सातत्याने बैठकांच्या माध्यमातून प्रशासनाला उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. काल (शुक्रवारी) पालकमंत्र्यांनी सात रस्ता येथील नियोजन भवनात त्यासंदर्भात बैठक घेतली. त्या वेळी "आरसीपी'ची एक तुकडी तर सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, एमआयडीसीसह अन्य पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी बोलावण्यात आले होते. दरम्यान, सात रस्त्याहून विजयपूरकडे (कंबर तलाव) जाणारा मार्गही वाहतूक पोलिसांनी बंद केला होता. यापूर्वी उजनीच्या पाण्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर पालकमंत्र्यांचा निषेध केला जाणार असून त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यावेळीही असाच बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता पाण्यासंदर्भात निर्णय रद्द होऊनही पालकमंत्र्यांच्या बैठकीवेळी पोलिसांचा तसाच बंदोबस्त ठेवला जात आहे. अजूनही पालकमंत्र्यांना निषेधाची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री राजकारण सोडणार का?
उजनी धरणातील पाणी वाटपातील एक थेंबही पाणी इंदापूरसाठी नेणार नाही. जलसंपदा विभागाने काढलेल्या आदेशावरून गैरसमज झाले असून उजनीच्या पाण्यातून एक थेंब जरी पाणी नेले, तर आमदारकी, मंत्रिपद सोडेन. एवढेच काय राजकारण सोडून देईन, असे स्पष्टीकरण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. उजनी धरणात आलेले सांडपाणी इंदापूरला नेले जाणार होते, हे स्पष्ट झाले. परंतु, धरणात आलेले पाणी सोलापूरच्याच वाट्याचे आहे, त्यामुळे त्या पाच टीएमसी पाण्यावरून वाद पेटला आणि अखेर तो निर्णय जलसंपदा विभागाला रद्द करावा लागला. आता पालकमंत्री राजकारण सोडणार का, असा प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.