
Ujjani Dam : उजनी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर
केत्तूर : सोलापूर-पुणे तसेच नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे सुमारे १११ टक्के (१२३ टीएमसी) भरले होते. उजनी धरणामध्ये पावसाळ्यात अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने व धरण ओव्हरफ्लो झाल्याने भीमा नदीतून पाणी सोडून देण्यात आले होते.
परंतु, सोलापूरला नदीवाटे तसेच कालवे आणि बोगद्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडल्याने जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या धरण ७५ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने उजनी फुगवटा तसेच लाभक्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज भासते. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळ्यात दोन आवर्तने, तर रब्बी हंगामात एक आवर्तन सोडले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता तसा प्रस्ताव कालवा सल्लागार समितीपुढे ठेवला आहे. त्याप्रमाणे उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
धरणातून विसर्ग
बोगदा ः २९६ क्युसेक
दहिगाव उपसा सिंचन योजना ः १०० क्युसेक
मुख्य कॅनॉलद्वारे सोडलेले पाणी ः ८०० क्युसेक
१४ फेब्रुवारीची धरणाची स्थिती
पाणीपातळी - ४९५.६८५ मीटर
एकूण पाणीसाठा - २९५३.९५ दशलक्ष घनमीटर (१०४.३१ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा - ११५१.१४ दशलक्ष घनमीटर (४०.६५ टीएमसी)
टक्केवारी ः ७५.३७ टक्के
आतापर्यंत संपलेले पाणी ः ११.७४ टीएमसी
२३ जानेवारीची धरणाची स्थिती
पाणीपातळी ः ४९६.७३० मीटर
एकूण पाणीसाठा - ३२८६.५४ दशलक्ष घनमीटर (११६.०५ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा -१४८३.७३ दशलक्ष घनमीटर (५२.३९ टीएमसी)
टक्केवारी ः ९७.७९ टक्के