Waste Management : कॉरिडॉरमध्ये अस्वच्छतेविरोधात कडक अंमलबजावणीचा विचार करण्याची वेळ

पवित्र नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आता कारवाईच्या बडग्याचीच गरज आहे, असे वाटते.
Pandharpur Live News
Pandharpur Live Newssakal

Pandharpur News : दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी आणि चंद्रभागा ही पवित्र स्थाने आहेत. परंतु, चंद्रभागेचे पावित्र्य मात्र जपले जात नसल्याचे भयानक व भयावह चित्र दिसते.

चंद्रभागेत केलेली घाण, टाकलेले साहित्य पाहून यावर भविष्यात होणाऱ्या कॅारिडॉरमध्ये शासकीय यंत्रणेद्वारे नियंत्रणाच्या दृष्टीने विचार करण्याची वेळ आलेली आहे. पवित्र नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आता कारवाईच्या बडग्याचीच गरज आहे, असे वाटते.

वारकरी शिक्षण मंडळ, रोटरी क्लब आणि पंढरपूर नगरपालिकेच्या सहकार्याने ‘सकाळ’च्या पुढाकारातून सोमवारी (ता. ३१ जुलै) चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. बाल वारकऱ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील माऊलींनी या मोहिमेत हातभार लावला होता. विशेष म्हणजे महिलांची हजेरी नजरेत भरण्यासारखी होती.

सर्वजण अगदी मनापासून वाळवंटाची स्वच्छता करण्यात मग्न होते. चंद्रभागा स्वच्छता मोहिमेवेळी नुकताच आलेला अनुभव फारच विदारक असा होता. ते नावालाच वाळवंट होते. वाळूचा लवलेशही तेथे नव्हता.

इतकेच काय, तर आपल्या मागील पिडा टळण्याच्या भावनेतून भाविक चंद्रभागेच्या पात्रात काय काय आणून टाकतात हे पाहून आश्‍चर्य तर वाटलेच त्याहून ते विदारक चित्र पाहून घृणाच वाटली. प्रबोधनातून काही साध्य होईल, असे वाटत नसल्याने आता हात टेकल्याची भावना मनी आली.

‘सकाळ’ ने चंद्रभागेच्या म्हणजे भीमेच्या प्रदूषणाविरोधात कायम आवाज उठविला आहे. त्याचबरोबर नदी प्रवाही अन् प्रदूषणविरहित राहण्यासाठी प्रबोधनाची चळवळ हाती घेतली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शासनास जाग आणण्यासाठी अप्पर भीमेतून येणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ४८ लाख लोकांच्या जीवनात या नदीमुळे कायापालट तर झालाच आहे. त्याचबरोबर विकासाची गंगा दारोदारी पोचली आहे. परंतु, हे प्रदूषित पाणी पिण्यामुळे पसरणाऱ्या अनारोग्याबाबत शासकीय पातळीवरील उदासीनता पाहिल्यानंतर कमालीचे वैषम्य वाटते.

शासन यंत्रणेतील एकाही विभागाला याबाबत यासाठी काही पावले उचलावीत असे का वाटत नाही, हाच प्रश्‍न सतावतो आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तर अक्षरशः हातच टेकले आहेत. भीमेतील प्रदूषणाचा एक वेगळा विषय आहे, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरुच आहेच.

भारतीय संस्कृतीत गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, चंद्रभागा, नर्मदा अशी नद्यांना नावे आहेत. त्याचे महत्त्वही मोठेच आहे. हीच नावे अनेकांच्या आईला दिलेली आहेत. या सर्व नद्यांचे प्रदूषण करुन आपण आईची ओटी कशाने भरतो, याचे भानही राहात नसल्याचे जाणवते.

अजून काय हवे?

भीमेच्या प्रदूषणाबरोबरच चंद्रभागेतील अस्वच्छता हा एक गहन विषय अनुभवास मिळाला. विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागेत स्नान केल्याने मोठे पुण्य मिळते, अशी भावना आहे. परंतु, चंद्रभागेच्या वाळवंटाची स्थिती पाहिली तर तेथील वातावरण पाहून मन फारच विषण्ण होते.

घरातील देव-देवतांचे फोटो, फुटलेल्या काचा, घरातील मृत पावलेल्या व्यक्तींची आठवण नको म्हणून त्यांची छायाचित्रे, चंद्रभागेस पापविनाशी समजून नदीत सोडून दिलेले सर्व प्रकारचे कपडे, भरमसाट शिल्लक अन्न, द्रोण-पत्रावळी, गाढवं व मोकाट कुत्र्यांची रेलचेल, दिवस-पाणी केलेले सारे साहित्य असे सारे विदारक चित्र पाहून या चंद्रभागेचे काय होत असेल याची

चिंताच वाटते. या वाळवंटात शौचास बसणाऱ्यांची संख्याही काही कमी नसल्याचे तेथे पडलेल्या शौचांच्या ढिगावरून दिसून आले. वाळवंटात चालताना प्रत्येक पाय जपूनच टाकावा लागत होता, यावरून ते समजून येईल. हेच पाणी पुढे सोलापूरच्या नागरिकांसाठी पिण्यास येते. अनारोग्याबाबत अजून काय हवे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com