राजू शेट्टींनी राज यांच्या भूमिकेचे का केले स्वागत

Why Raju Shetty welcomed the role of Raj
Why Raju Shetty welcomed the role of Raj

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन झाले. या वेळी शेट्टी यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावरही जोरदार टीकास्त्र सोडले. 

सावधान... सायबर गुन्हेगारांचे महाराष्ट्रावर लक्ष्य
माजी खासदार शेट्टी म्हणाले, राज्यातील सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे शॅडो कॅबिनेटसारखी संकल्पना राबवत असतील, तर त्यांच्या संकल्पनेचे स्वागत आहे. या वेळी केंद्रातील भाजप सरकारने एमएसी बॅंकेतील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सात-बारा उतारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. सरकार सत्तेवर येऊन 50 दिवस उलटून गेले, तरी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांशी बेइमानी करणाऱ्या ठाकरे सरकारला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 
शेट्टी म्हणाले, भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही. बाजार समितीत शेतकऱ्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून टाकल्याने ठाकरे सरकारदेखील शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात आणून बाजार समित्या हा राजकीय अड्डा बनवण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ काही शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे सरकारने थकबाकीबरोबरच चालू पीक कर्जही माफ करावे. 

सदाभाऊ खोत फालतू माणूस... 
सदाभाऊ खोत यांची सांगली जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी ईडीमार्फत स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांतील हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. यातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घ्यावी. सदाभाऊ खोत हे केवळ सत्तेसाठी लाचार झाले आहेत. त्यांनी केलेली टीका मी फारशी मनावर घेत नाही. तो माणूस नुसता फालतू असल्याचेही या वेळी शेट्टींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com