सोलापूर : आतापर्यंतच्या लढायांमध्ये सर्वाधिक जिवितहानी कोरोना महामारीमुळेच झाली आहे. कोरोनाविरुध्दची लढाई ही आपण सर्वजण नियमांचे काटेकोर पालन करूनच जिंकू. कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचल्यानंतरही काळजी घेतल्यास निश्चितपणे कोरोना होणार नाही, असा विश्वास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये व्यक्त केला. तत्पूर्वी, 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले.
पुढील काळात माझे हेच धेय्य...
कोरोना काळात मास्क न घालणाऱ्यांचा दंड शंभर रुपयांवरून पाचशे रुपयांपर्यंत वाढविला. मात्र, बहुतांश जणांकडे दंडाची रक्कम भरायलासुध्दा पैसे नाहीत. ग्रामीण भागात मास्कचा वापर असो वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतोतंत होताना दिसत नाही. कोरोनामुळे संपूर्ण जगाल वेढा दिला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली, तरीही लस घेतल्यानंतर 100 टक्के कोरोना होणारच नाही, असे कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या ट्रेण्डला ही लस उपायकारक आहे का, याबद्दलही संभ्रम आहे. त्यामुळे या विषाणूविरुध्दची लढाई जिंकण्यासाठी नागरिकांनी दंड भरण्यापेक्षा नियमांचे पालन करणे हाच एकमेव पर्याय आहे, असेही सातपुते यांनी यावेळी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार या मोहिमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकीतून काम करायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
कोरोना काळात वाढले नवे गुन्हेगार
चोरी असो वा अन्य कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराचे काहीतरी वैशिष्ट्ये असते. त्याची पडताळणी मोडस ऑपरेटिंग सिस्टिमनुसार (पोलिस गुन्ह्याची माहिती एलसीबीच्या पथकाला देतात आणि गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्हेगारांची ठळक वैशिष्ट्ये सांगून हे पथक चोरापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखविते.) केली जाते. मात्र, कोरोना काळात मोडस ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करुनही गुन्हेगारांचा शोध घेण्यात अपेक्षित यश आले नाही. त्याचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, लॉकडाउन काळात परगावी गेलेले अनेकजण परत मूळगावी आले. सुमारे तीन लाखांपर्यंत लोक कोरोना काळात जिल्ह्यात परतल्याची माहिती आहे. चोरीसह अन्यप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अलिकडे नव्या गुन्हेगारांचा समावेश झाल्याचे समोर आले आहे. परंतु, गुन्हेगारीचा शेवट हा वाईटच होतो आणि म्हणून कष्टाचे जीवन कधीही अधिक चांगले असते. त्यातूनच कुटुंबाबरोबरच स्वत:च्या प्रगतीचा मार्ग सापडेल म्हणून गुन्हेगारी सोडावी. तर नागरिकांनीही स्वत:च्या संपत्तीची व जिविताची सतर्क राहून काळजी घ्यावी, असा सल्ला पोलिस अधीक्षकांनी यावेळी दिला.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला
पोलिस ठाण्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 25 पोलिस ठाणे आहेत. मात्र, एका पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे 150 ते 200 गावे आहेत. सध्या ग्रामीण पोलिस दलात दोन हजार 300 कर्मचारी आणि 150 अधिकारी आहेत. वाहतूक शाखेंतर्गत 30 कर्मचारी काम करतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रशासकीयदृष्ट्या चांगली सेवा देता येईल, पोलिसांच्या कामात आणखी सुसूत्रता येईल म्हणून सांगोला, करमाळा, मंगळवेढा, तालुका पोलिस ठाण्यांतर्गत आणखी एक पोलिस ठाणे सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांची मान्यता मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यांचा विस्तार शक्य होईल, असेही सातपुते म्हणाल्या. दुसरीकडे सध्या जी गावे शहरीकरण झाली आहेत, त्या गावांचा समावेश शहरात करण्यासंदर्भात आम्ही अभिप्राय दिल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.