"सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळाला बदलावा लागला निर्णय

Maharashtra State Road Transport Corporation
Maharashtra State Road Transport Corporation

सातारा : सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा-पुणे (स्वारगेट) विनावाहक, विनाथांबा बससेवेत प्रवाशांना दिलेला "शिवशाही' बसचा अतिरिक्त डोस काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. दिवसभरातील "शिवशाही'च्या 14 फेऱ्या कमी करून साध्या बसच्या (लालपरी) 13 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार दै. "सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्यामुळे सातारा विभागाला हा निर्णय घ्यावा लागला.

 
साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. त्याचा विचार करून तत्कालीन विभाग नियंत्रक प्रतापसिंह सावंत यांनी सातारा-पुणे ही विनावाहक, विनाथांबा बससेवा सुरू केली. पहिल्या दिवसापासूनच या सेवेला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यात युती शासनाच्या काळात आरामदायी प्रवासासाठी "शिवशाही' बस सुरू करण्यात आल्या. सातारा विभागही त्याला अपवाद नव्हता.


अवश्य वाचा -  शिवशाही बरोबर साध्या बसचाही पर्याय
 

प्रवाशांसह लाेकप्रतिनिधींना दिला हाेता इशारा
 

"सातारा-पुणे'साठी दर तासाला "शिवशाही' सुरू करण्यात आली. या सेवेचा दर साध्या सेवेपेक्षा (लालपरी) 65 रुपयांनी जास्त असल्याने प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. तरीही 15 दिवसांपूर्वी "सातारा-पुणे'सेवेच्या वेळापत्रकात बदल करत प्रवाशांना "शिवशाही'च्या फेऱ्यांचा अतिरिक्त डोस देण्यात आला. त्यासाठी साध्या बसच्या 40 ऐवजी 28 फेऱ्या, तर "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या. "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या. या सेवेसाठी 12 "शिवशाही' व 10 साध्या बस वापरण्यात येत होत्या. "शिवशाही'ला साध्या बसपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत असल्याने प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. त्याचबरोबर नवीन बदलालाही त्यांच्याकडून विरोध होत होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 

पुन्हा साध्या बसच्या फेऱ्या वाढविल्या

प्रवाशांच्या मागणीची व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल घेत "सातारा-पुणे' सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवीन नियोजनानुसार आता पहाटे सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत साध्या बसच्या 41 व "शिवशाही'च्या 14 फेऱ्या (एकूण 55 फेऱ्या) सुटतील. "भागीरथ' कंपनीच्या चार "शिवशाही' बस बंद करण्यात आल्या असून त्या ठिकाणी साध्या बसच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. आता महामंडळाच्या तीन व "एस. के. एस.' कंपनीच्या तीन याप्रमाणे "शिवशाही'च्या सहा बस वापरल्या जातील. त्याशिवाय 16 साध्या बस वापरल्या जाणार आहेत. दर 15 मिनिटांच्या अंतरात या बस सोडण्यात येतील. त्यातही प्राईम टाइमला (उदा. सात, साडेसात, आठ) साध्या बस सोडण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सातारा विभागाने केलेल्या बदलाचे प्रवाशांतून स्वागत होत आहे. 

नवीन नियोजनानुसार... 
साध्या बसच्या फेऱ्या- 41 
"शिवशाही' बसच्या फेऱ्या- 14 

तिकीट दर... 
साधी बस- 135 
शिवशाही- 200 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com