फुलण्याआधीच कळ्या खुडण्याची वेळ: काय झाले?

 Time to pluk the buds before flowering
Time to pluk the buds before flowering
Updated on

कुरळप (जि सांगली) ः कोरोना आणि लॉकडाउनच्या महाभयंकर संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. फुलशेती करणाऱ्या वशी येथील शरद जगताप यांना तर रोज जरबेरा शेतीतील रोज चार हजार फुलकळ्या उमलण्याआधीच तोडून उकिरड्यावर टाकण्याची वेळ आली आहे. लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोवळ्या कळ्या काळजावर दगड ठेवून तोडाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्चशिक्षित शरद सदाशिव जगताप यांनी परदेशात प्रिंटिंग मॅनेजर या पदावर काही काळ काम केले. स्वतःची वेगळी ओळख व्हावी, या इच्छेने चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि स्वदेशी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखविण्याची जिद्द उराशी बाळगून मोठ्या हिमतीने 2017-18 मध्ये आपल्या शेतजमिनीत हरितगृह उभारले. तीस गुंठे जमिनीत हरितगृह उभारण्यासाठी 50 लाख रुपये इतका खर्च आला. 35 लाख रुपये बॅंकेकडून कर्ज घेतले. सहा महिन्यांनंतर उत्पन्न सुरू झाले. गेल्या वर्षीच्या हंगामात काही पैसे मिळाले. यंदा कर्जाचा हप्ता भागून काही पैसे शिल्लक राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन झाले अन्‌ं शरद यांची फुले उमलण्यापूर्वीच उकिरड्याची भर होऊ लागली. 

यंदा शेवटचा तोडा 20 मार्चला घेतला होता. त्यानंतर लॉकडाउनमुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली. एप्रिल व मे तसा मोठ्या धामधुमीचा हंगाम. या हंगामात सरासरी सहा रुपये दराने फुल जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच. कळीचे रूपांतर फुलात होऊ नये म्हणून शरद यांच्यासह त्यांच्या पत्नी विद्या, भाऊ अर्जुन, त्यांच्या पत्नी वनश्री, वडील सदाशिव जगताप व आई बायाक्का असे घरातील सर्व जण व कर्मचारी मिळून सकाळपासून सायंकाळपर्यंत जड हाताने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली कळी तोडून टाकत आहेत. उत्पन्न शून्य अन्‌ बाग जगविण्यासाठी औषध, लागवड, मेहनत, पाणी आदींसाठी खर्च महिन्याला 25 ते 30 हजार रुपये इतका येत आहे.

रोज चार हजारांवर कळ्या तोडून टाकल्या जातात. आतापर्यंत सुमारे दीड ते दोन लाख कळ्या तोडल्या आहेत. शासनाकडून या हरितगृहासाठी रचना उभी करण्यासाठी व रोपांच्या लागवडीसाठी 50 टक्के इतके अनुदान मिळते, मात्र यातले रचना उभी करण्यासाठीचे अनुदान मिळविण्यासाठी शरद यांना काही वर्षे प्रयत्न करावे लागले. यात मिळालेले अनुदान व्याजासाठी भरावे लागले. आता रोपांच्या लागवडीसाठी मिळणारे 50 टक्के अनुदान राम भरोसे आहे. अनेक अडचणीत सापडलेल्या शरद यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. 

नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी

भारतीय नागरिकांनी प्लास्टिकच्या फुलांची मागणी न करता शेतकऱ्यांनी जमिनीत पिकविलेल्या नैसर्गिक फुलांची मागणी करावी. शासनाने प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घातली पाहिजे. माझे नुकसान खूप झाले असून, शासनाने जोपर्यंत लॉकडाउन उठत नाही व मालाचा उठाव होत नाही, तोपर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. 
- शरद सदाशिव जगताप, वशी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com