आरग (जि. सांगली) : मिरज पूर्व भागातील आरगसह परिसरात तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीस येथील पाणी साठे आटू लागले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी आक्रमक झाला आहे. आरग मध्ये आठ दिवसांतून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी परिसरातील पाझर तलावासह अन्य पोट कालव्यात सोडण्याची मागणी आतापासूनच जोर धरली आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पुराचे पाणी म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागाला सोडण्यात आले. ओढे, नाले, पाझर तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, तरीही पाण्याच्या नियोजनाअभावी येथील परिसराला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पूर्व भागातील नाले, पाझर तलाव, बंधारे सद्य:परिस्थितीत कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढणार आहे. शेतीसाठी पाणी कमी पडत असून उसासह अन्य पिके वाळत आहेत. म्हैसाळ योजना सुरू झाली असली तरी या पाण्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेणण्याची मागणी होत आहे.
म्हैसाळ योजनेच्या पाण्याने पाझर तलाव भरून घेणे गरजेचे
सध्या आरगमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी विहिरीतील पाणी साठा पूर्ण पणे संपला आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी म्हैसाळ योजनेच्या पाण्याने पाझर तलाव भरून घेणे गरजेचे आहे.
- सौ. सुरेखा नाईक, सरपंच, आरग
म्हैसाळ योजनेचे पाणी पोट कॅनलमध्ये सोडा
शेतीसाठी पाणी कमी पडत आहे. पिके वाळू लागली आहेत. विहिरीतील पाणी साठा संपत आला आहे. परिणामी म्हैसाळ योजनेचे पाणी पोट कॅनल मध्ये सोडावे.
- मारुती कुंभार, माजी प्रशासक व शेतकरी, आरग.
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.